ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.958

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९५८

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके गळती अभंग ९५८

आदि आत्मज्योतीलिंगा प्रती लावियेला घटु । स्थावरिलें मायावस्त्र लिंगावरी प्रविष्टु । तपन नाम ध्वनी इंद्रिया केलें सपाटु ॥१॥ हळुहळु गळती गळे गळों लागली सकाळें । उच्चारितां कृष्णनाम । भेणें पळिजे कळिकाळें ॥धृ॥ त्रिगुण सुटल्या गांठी घटु विराला सघना पंचतत्त्वें । एके ठायीं आत्मा नांदे परिपूर्ण । जिव शिव हारपले एक दिसे चैतन्य । आत्माराम विदेहिया श्रीगुरुनें सांगितली खूण ॥२॥ गळतीलागी अपाय मोठे विरुळा जाणें हेंचि खूण । नरदेह अवचितें जो साधकु होय नारायण । परमानंदे गळती गळे पांचहि तत्त्वे हरपोन ॥३॥ निवृत्ति सखा माझा दीनदयाळु श्रीगुरु । अलंकापुरीं स्थापियेलें । दिधला विठ्ठल उच्चारु । समाधीजीवन माझेंवरी अजान वृक्षतरु ॥ जंववरी चंद्रसूर्य तंववरी कीर्तिघट स्थिरु ॥४॥ गाति वाति साधु मुनी छंदू घट मठी चित्त । विरेल देहबुद्धि ज्ञानदाता देईल उचित । विज्ञानेंसी गोष्टी सांगे ऐसे पद पावत । बापरखुमादेविवरु लांबविला घट ज्ञानदेव सांगत ॥५॥

अर्थ:-
सर्व जगताचा आदि असलेला जो आत्मा हेच कोणी एक शंकराचे लिंग आहे. अशी कल्पना करुन त्यावर अभिषेकार्थ घट लाविला.आणि त्या लिंगावर मायारुपी वस्त्र घालून आच्छादन केले. नामध्वनीच्या योगाने सर्व इन्द्रिये मावळून गेली. हलके हलके गळती लागल्यामुळे कृष्णनामोच्चाराच्या योगाने इंद्रियासहित वर्तमान देहभाव हळूहळू गलित होऊ लागला. त्याचप्रमाणे नामोच्चारणाच्या भयाने कळिकाळहि पळू लागला. अंतःकरणाच्या ठिकाणी सत्त्व रज तम या गुणापासून उत्पन्न होणाऱ्या विकारांच्या गाठी सुटून देहरुपी घट पंचतत्त्वासह वर्तमान त्या आत्मतत्त्वात मिळून जाऊन तसेच जीव शिवादि भेद नाहीसे होऊन सर्वत्र चैतन्य आत्मानंद परिपूर्ण देहामध्येच विदेहरुपाने पाहाण्याची खूण श्रीगुरूंनी सांगितली. अशारितीने आत्मस्वरुपाच्या ठिकाणी देहाची गळती लागल्यास अनात्मविषयक संस्काराचा मोह प्रतिबंध असतो. म्हणून त्या प्रतिबंधाला दूर करुन देहदृष्टयादि भाव परमात्मरुप होण्याची खूण साहजिकच नरदेह प्राप्त झाला असता. जो साधक जाणून नारायणरुप होतो. आणि परमानंदरुपामध्ये गळती लागल्यामुळे पांचही तत्त्वे हारपून जातात असा श्रीगुरु कृपापात्र अधिकारी विरळा. दीनाविषयी अत्यंत कळकळ बाळगणारे माझे श्रीगुरु निवृत्तिरायांनी माझी अलंकापूरीत स्थापना करुन अजानवृक्षाखाली समाधीचे जीवन देवून यावत् चंद्र सूर्यापर्यंत माझा किर्तिरुप घटांत स्थीर केला. अशा या ज्योतिर्लिंगाचे, जे साधु मुनी देहरुपी घटांत, चित्ताने छंद घेऊन गायन करतील. वर्णन करतील ते देहरुपी घटांत अशारितीने देहबुद्धी विरुन ज्ञानदाता श्रीगुरु त्यांना योग्य अशा अपरोक्षज्ञानाचा विचार सांगेल त्यायोगे आत्मपद पावून जीव कृतार्थ होतील.माझे पिता व रखुमादेचे पती जे श्री विठ्ठल यांनी माझ्या देहरुपी घटाला चिरंजीव केले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading