👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ९००
ज्याचिये आवडी संसार त्यजिला । तेणें कां अबोला धरिला गे माये । पायां दिधली मिठी घातली जीवें गांठी । साऊमा नये जगजेठी उभा ठेला गे माये ॥१॥ भेटवा वो त्यासी चरण झाडीन केशीं । सगुणरूपाशी मी वो भाळलिये ॥२॥ क्षेमालागी जीउ उतावेळ माझा । उचलोनी चारी भुजा देईन क्षेम । कोण्या गुणें कावो रूसला गोवळु । सुखाचा चावळु मजसी न करी गे माये ॥३॥ ऐसें अवस्थेचे पिसें लाविलेसें कैसें । चित्त नेलें आपणिया सरिसें गे माये । बापरखुमादेविवरें लावियेलें पिसें । करूनी ठेविले आपणीया ऐसें गे माये ॥४॥
अर्थ:-
ज्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीकरितां सर्व संसार टाकून दिला. त्याने माझ्याशी का बरे अबोला धरिला. कुणाला ठाऊक? त्याच्या पायांवर मिठी घालून जीवाची गांठ बांधली. तरी तो परमात्मा श्रीकृष्ण माझे समोर उभा राहून मला प्रत्यक्ष भेट देत नाही. कसेतरी करून माझी त्याची भेट करवा हो ! त्याचे पाय आपले केसांने झाडीन. त्याच्या सगुणरूपाला मी अगदी भाळून त्याला अलिंगने देण्यांकरिता माझा जीव अत्यंत उतावीळ झाला आहे. त्याच्या चारी भुजा उचलून त्याला अलिंगन केंव्हा देईन असे झाले आहे. तो गोधने राखणारा श्रीकृष्ण परमात्मा मजवर कां रूसला आहे कोण जाणे? माझ्याशी तो सुखाच्या चार गोष्टी करीत नाही.अशा अवस्थेचे वेड मला कसे विलक्षण लावले आहे. माझे चित्तच आपल्या स्वरूपांच्या ठिकाणी घेऊन गेला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनी मला वेड लावून आपल्या सारखे करून ठेवले. असे माऊली सांगतात.