👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८९८
पैल विळाचिये वेळी आंगणी उभी ठेलिये । येतिया जातिया पुसे । विठ्ठल केउता गे माये ॥१॥ पायरऊ जाला संचारू नवल । वेदें विंदान लाविलें म्हणे विठ्ठल विठ्ठल ॥२॥ नेणें तहान भूक । नाही लाज आभिमान । वेधिलें जनार्दनीं । देवकीनंदनु गे माये ॥३॥ बापरखुमादेविवरू जिवींचा जीवनु । माझे मनीचे मनोरथ । पुरवीं कमळनयनु गे माये ॥४॥
अर्थ:-
एक विरहिणी म्हणते, पुष्कळ वेळ झाला मी अंगणांत उभी राहिली आहे. आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारते. माझा पांडुरंग कोठे आहे तुम्ही कोणी पाहिला आहे काय? पण आश्चर्य हे की मला दृष्ट लागल्याप्रमाणे होऊन त्या श्रीकृष्णाचा छंद लागल्यामुळे तोंडाने सारखी श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल नामाचा घोष करते. त्या छंदात तिला तहान भूक, लोकलज्जा किंवा देहाभिमान याची आठवण नाही कारण देवकीचा नंदन भगवान श्रीकृष्ण त्याकरिताच तिला त्याचा छंद लागून राहिला आहे. तिला अशी खात्री आहे की माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, सगळ्या जीवांचे जीवन कमलनयन असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो माझ्या मनांतले मनोरथ परिपूर्ण
करीलच करील. असे माऊली सांगतात.
