
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके गौळणी अभंग ८५८
दुडीवरी दुडी गौळण साते निघाली । गौळणी गोरसु म्हणों विसरली ॥१॥ गोविंद घ्या वो दामोदर घ्या वो । तव तव बोलती मथुरेच्या वो ॥२॥ गोविंद गोरसु एकचि नांवा । गोरसु विकू आले तुमच्या गांवा ॥३॥ बापरखुमादेविवर विठ्ठलेंसी भेटी । आपले संवसाटी करुनी ठेली ॥४॥
अर्थ:-
भगवंताच्या नामस्मरणामध्ये रंगलेली एक गौळण गोरस भरलेले डेरे एकावर एक ठेवून मथुरेच्या बाजारांत विकण्यांकरिता गेली असता ती दही घ्या वो दही, दूध घ्यावो दूध, असे म्हणण्याचे विसरुन. गोविंद घ्या हो, दामोदर घ्या हो. असे म्हणू लागली. तेव्हां मथुरेच्या गौळणीनां या तिच्या म्हणण्यांचे आश्चर्य वाटून, ही असे काय म्हणते असे एकमेकीत बोलू लागल्या आणि तिला परमात्म्यांचा वेद लागला आहे. असा त्यांनी निश्चय केला. मथुरेच्या बायांचे ते मनोगत जाणून विकणारी म्हणाली गोविंद काय किंवा गोरस काय या दोहीचा अर्थ परमात्माच आहे. कारण सर्व त्रैलोक्य परमात्मरुप आहे. आणि तोच की, तुमच्या गांवात विकावयाला आणला आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांची यथार्थ भेट झाली असता, भेट होणाऱ्याला तो आत्मरुप करुन टांकतो. म्हणजे भेट घेणारा परमात्मरुप होतो. अर्थात त्याचे सर्व व्यवहारही परमात्मरुपच असतात. असे माऊली सांगतात.
