ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.798

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९८

देवा तुज नेणतांना कांहीं न सांभाळितां नानायाती धरूनी धाविन्नलों । धांवता धांवता पुढे सुनाट देखिलें त्याची पाऊली मागुती मुरूडलों जी सुंदरा ॥१॥ आलों भक्तिशाळे अतौता तेथे कांहींएक गौरव गमलें । जेणें वेषें आहे तेणें तुजजोगें नव्हे मग ऐसें कांहीं एक गुंथावें केलें जी सुंदरा ॥२॥ असो येणे औटहातें काई होईल म्हणोनी एकची वेळां उगविलें । आब्रह्म सकळैक जग आपणापें तुज एकलागी आणियेलें हो सुंदरा ॥३॥ आतां अवघा तुजडोळां पाहेन दातारा आलिंगीन अवघाची बाहीं । अवघा मुखीं तुजसी बोलत आहे न घ्याईजे मा चालिली अवघाचि पायीं जी सुंदरा ॥४॥ आतां अवघा वेळु अवघेपणे तुज अवघीयातें गिळूनी ठेलों । तुझीये भक्तीची चवी जों लागली तंव अवघेपणा उबगलों जी सुंदरा ॥५॥ पाहतां दर्पण परता नेलिया दुजेपण रिघे पाहाते भागीं । ऐसें आदि मध्य अवसान जाणोनी अवचितां जडिनलों तुमच्या अंगी हो सुंदरा ॥६॥ आतां तुज पावेन कवणे दशे नातळसी दुजेपणा केला हो तूं पण नाहीं । तेथे मीपण कैचें होतेनि मिळणें तें गेलें ठाईंच्या ठाईं जी सुंदरा ॥७॥ ऐसा न जेविलाचि जेविला की जेविलाची भुकेला तृप्तातृप्त दोन्ही नाहीं । बापरखुमादेविवर विठ्ठला वरपडा जालों ऐसियासी कीजे काई जी सुंदरा ॥८॥

अर्थ:-

अहो देवादिदेवा तुमच्या स्वरूपाचा काही विचार न करता तसेच आपल्या रक्षणाची काळजी न घेता मी अनेक जातीमध्ये धावपळ केली.अशी धावपळ करून पुढे जातो तो पुढे ओसाड आहे असे मला दिसले. तसेच त्यांतून कांही सुख मिळेल असे वाटेनासे झाले मग त्याच पावली माघारी फिरलो. आणि माघारी फिरून तुझ्या भक्तिसाठी शाळेत आलो.तेथे काही बरे वाटले.आतां ज्या मनुष्यवेषांत आम्ही आहोत त्या नुसत्या मनुष्य शरीरप्राप्तीनेच तुझी प्राप्ती होईल असे नाही. मग अशी कांही एक कल्पना मनांत आली की या साडेतीन हाताच्या मनुष्य शरीरांत काही उपयोग होईल म्हणून एकदम मनांत विचार उत्पन्न झाला. ब्रह्मदेवापासून सर्वजण हे तुझ्या स्वरूपामध्ये असता एका भक्तिप्रेमाच्या सौख्याकरिता हे जग तुम्ही स्पष्ट दशेला आणलेत. याकरिता आतां मी डोळ्यांने तुलाच पाहीन. मी आपल्या सर्व बाहुने तुलाच आलिंगन देईन. मुखाने बोलण्याचा सर्व व्यवहार तुझ्याशीच करीन. मनाने दुसऱ्याचे ध्यान करणार नाही. तुझ्या दर्शनाकरिता पायाचे चालणे करीन. असा सर्ववेळ सर्व रितीने सर्वरूप जो तूं त्या तुझ्या करिताच खर्च करीन. तुझ्या भक्तिची चव(गोडी) जी मला लागली आहे. त्यामुळे या अनंततत्त्वाचा ही कंटाळा आला आहे. आपले मुखदर्पणांत पाहिल्यानंतर दर्पण काढून टाकला तर आरशातील प्रतिबिंबाचे जसे पहाणाऱ्याशी ऐक्य होते. त्याप्रमाणे आदि, मध्य, शेवटी असलेल्या तुझ्या स्वरूपाला मी अवचित जडुन गेलो. असे ऐक्य झाल्यानंतर तुझ्याशिवाय दुसरेपणाला ठिकाण नसल्यामुळे दुसरेपणाने तूं दिसत नाहीस. जेथे तूपणा नाहीसा होतो. तेथे मीपणा कोठे राहणार? आणि मग ऐक्य झाले असे म्हणणे कोठे संभवते. कारण ऐक्य मुळचेच होते. यारितीने परमात्मस्वरूपाला जरी जीव प्राप्त झाला नाही. असे जीवाने आपले ठिकाणी जरी मानले तरी तो परमात्मस्वरूपाला नित्य प्राप्त आहेच. असा नित्यप्राप्त असला तरी जोपर्यंत जीवाला तसे ज्ञान झाले नाही. तोपर्यंत तो परमात्मस्वरूपाविषयी तृप्त नसून भुकेला असणारच वास्तविक परमात्मस्वरुपाच्या प्राप्तीने किंवा अप्राप्तीने अतृप्त असे तृप्तातृप्त हे दोन्ही भाव परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत. माझे मात्र माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याच्याशी ऐक्य होऊन गेले. आता याला काय करावे? असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading