👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ५८
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण् करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥
अर्थ:-
देवाच्या प्राप्तीचे दार म्हणजे हरिनाम ते क्षणभर घेतले तर आत्मसाक्षात्कार दाखवणाऱ्या चारी मुक्ती साध्य होतात. त्या हरिनामाचे सतत स्मरण करणाऱ्याचे येवढे पुण्य होते की त्या पुण्याची गणती होत नाही. संसारात सर्वात घात करणारी जीभ आहे पण तिला हरिनामाचे वळण लावले तर सुख प्राप्त होते असे वेद हातवर करुन सांगतात. हरिनामाने देव कसा अंकित होऊन भक्ताचे सर्व कार्य त्याच्या घरी येऊन करतो ह्याची साक्ष व्यासानी दिली आहे असे माऊली सांगतात.
