👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५३४
वांझेचिये पोरा तिघे झाले लेक । पारधीसी देख निघाले ते ॥१॥ उर्ण तंतु दोरा जाळे केले त्याचें । डोहीं मृगजळाचे धरिले मच्छ ॥२॥ नेले अंधापासीं मुके बोले त्याशी । दिले थोट्यापाशी ठेवणे तें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे केले अविद्येचें । संतासी तयाचे भय नाहीं ॥४॥
अर्थ:-
संसाराची भीती अज्ञानी लोकांना असते. संसार म्हणजे वांझेच्य परिवाराप्रमाणे आहे. याबद्दल माऊली एक मजेदार दृष्टांत देतात. एक वांझेला तीन नातू होते. ते माशांची शिकार करण्याकरिता निघाले. त्यांनी कोळयांच्या तोडांतून निघालेल्या दोऱ्याचे जाळे तयार केले.व ते घेऊन मृगजळाच्या डोहांतले मासे मारुन आंधळ्याच्या पुढे नेऊन ठेवले.त्या आंधळ्याशी एक मुका बोलत होता. ते मांसे थोट्या हाताच्या मनुष्याजवळ ठेवण्याकरिता म्हणून त्याने दिले. वरील दृष्टांता प्रमाणे. अविद्याकार्य संसाराची भीती अज्ञानी लोकांनाच असते. त्याची साधु संतांना भिती मुळीच नसते.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
