👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ९१३
मीपण माझें हरपलें । शेखीं ठकची विशेखीं पडिलें बाईये ॥१॥ काय सांगो तुम्हां कैचा हा गोवळु । न म्हणे वेळु आम्हां घरीं ॥२॥ नवल पैं केलें बुडविलें सगुण । आपणची निर्गुण होउनी ठेला ॥३॥ बापरखुमादेविवरू जीवन आमुचें । नाही पैं साचें कुळकर्म ॥४॥
अर्थ:-
एक गौळण आपल्या मैत्रीणीला सांगते अग सखे, माझा देहभावच नाहीसा होऊन शेवटी मी चकित झाले. हा श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे ग? तो आमच्या घरी येण्यास रात्र किंवा दिवस कांही एक म्हणत नाही. त्याचे कौतुक काय सांगू बाई ? त्या सगुण श्रीकृष्णाचे संगतीने काय नवल सांगावे? आतां त्या सगुणाने आपले सगुणत्व नाहीसे करून निर्गुण होऊन राहिला आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच आमचे जीवन असून कुलधर्मही तोच आहे.असे माऊली सांगतात
