ग्रामगीता अध्याय तिसरा आश्रम धर्म

ग्रामगीता अध्याय तिसरा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ३
Gram Gita Chapter III Beginning
----🕉ग्रामगीता अध्याय ३ आश्रम धर्म
आश्रम धर्म
श्रोतियांनी प्रश्न केला । मागे ब्रह्मचर्याश्रम निरूपला । जीवन -विकासाचा बोलिला । पाया धर्ममय ॥१॥
तेथे संशय उपन्न झाला । काय ब्रह्मचारी राहणे सर्वाला ? मग संसाराचा उलाढाला । कोणी करावा ? ॥२॥
यांचे उत्तर आहे सोपे । जग चाले कोणाच्या प्रतापे ? आपुलेच रडे आपणा न संपे । म्हणे जगाचे कैसे होय ? ॥३॥
अरे ! तुम्हास याची चिंता कशाला ? ते पाहू द्या निर्मीत्याला ।

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

ग्रामगीता अध्याय तिसरा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ३
Gram Gita Chapter III Beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय ३ आश्रम धर्म
आश्रम धर्म
श्रोतियांनी प्रश्न केला । मागे ब्रह्मचर्याश्रम निरूपला । जीवन -विकासाचा बोलिला । पाया धर्ममय ॥१॥
तेथे संशय उपन्न झाला । काय ब्रह्मचारी राहणे सर्वाला ? मग संसाराचा उलाढाला । कोणी करावा ? ॥२॥
यांचे उत्तर आहे सोपे । जग चाले कोणाच्या प्रतापे ? आपुलेच रडे आपणा न संपे । म्हणे जगाचे कैसे होय ? ॥३॥
अरे ! तुम्हास याची चिंता कशाला ? ते पाहू द्या निर्मीत्याला । तुम्ही साधलिया साधा व्रताला । ब्रह्मचर्याच्या ॥४॥
नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळा । परंतु अधःपात टाळा । वृत्ति आठवे विषयचाळा । तरि सांभाळा गृहधर्म ॥५॥
चोवीस वर्षे ब्रह्मचर्य । नियमे सांभाळिले वीर्य । तरि याने का खुंटेल कार्य । संसाराचे ? ॥६॥
मुलगा जरा वयात आला । हवे तैसे वागू लागला । बाळपणीच भोगी तारूण्याला । जन्म गेला दुःखी मग ॥७॥
ऐसे क्षयी श्वानसूकर । दुबळे पाप्याचे पितर । यांनी होईल का संसार । कधी सुखाचा ? ॥८॥
त्याचे जीवन म्हणजे पाप । त्याचा संसार म्हणजे ताप । त्यांचे संतान म्हणजे शाप । संसारासि ॥९॥
संसार सर्व सुखी व्हावा । आपुलाहि उध्दार घडावा । यास्तव ब्रह्मचर्याचा ठेवा । साधलाचि पाहिजे ॥१०॥


संसारपंथ न मोडावा । प्रजातंतु न खंडावा । म्हणोनि ब्रह्मचार्‍याने साधावा । गृहस्थाश्रम ॥११॥
ध्यानी घेवोनि निसर्गनियम । धर्मे योजिला गृहस्थाश्रम । ज्याने व्यक्ति -गाव -राष्ट्र उत्तम । धारणेत चाले ॥१२॥
इंद्रियांची दुर्धर गति । ती लागेना सहज हाती । पुढे होऊ नये फजीती । म्हणोनि यावे या मार्गी ॥१३॥
येरव्ही लग्न केलेचि पाहिजे । त्याविण कार्यचि न साजे । ऐसा आग्रह धरतील जे । ते व्यर्थवादी ॥१४॥
जयासि साधे इंद्रियदमन । वृत्ति सत्कार्यी रमे पूर्ण । त्याने केलेचि पाहिजे लग्न । ऐसे नाही ॥१५॥
परि संसार न करिता विरागी होय । त्यासि आहे महाभय । सेवासाधनाहि कठिण जाय । बिकट आहे मार्ग तो ॥१६॥
मुक्याने वेद अभ्यासावे । लंगडयाने पर्वती चढावे । आधंळ्याने युध्द करावे । तैसे कठिण ब्रह्मचर्य ॥१७॥
हे साधणे सोपे नाही । तैसीच ही निसर्गाशी लढाई । म्हणोनि त्याचा राजमार्ग तोहि । कथिला धर्मे ॥१८॥
मुलगा धर्मविद्या शिकला । अभ्यासाने सदगुणी झाला । शक्तियुक्तींनी उंबरठा गांठला । तारुण्याचा ॥१९॥
घडले निष्ठावंत ब्रह्मचर्य । शरीरी प्रगटले ओजवीर्य । निसर्गेचि झाले अनिवार्य । लग्न करणे ॥२०॥


न जाणो लग्नासि झाला उशीर । घडेल झणी दुर्व्यवहार । म्हणोनि वडील होती चिंतातुर । मुलासाठी ॥२१॥
योग्य देती लग्नसंस्कार । बालपणाचा पाडोनि विसर । करिती तया जबाबदार । दीक्षा देवोनि संसाराची ॥२२॥
गृहस्थाचा काय धर्म । कोणते आचरण काय वर्म । कैसे आचरावे कर्म । गृहस्थाश्रमा शिकविती ॥२३॥
आजवरि होता ब्रह्मचारी । आता वाढली जबाबदारी । पत्नी येता आपुल्या घरी । घरचि लागे साधावे ॥२४॥
मागे विद्यार्जनाचा व्यवहार । पुढे पाऊल पडे कामावर । म्हणोनि सावध – सावधान सत्वर । बोलती ज्ञाते ॥२५॥
निधि घेऊनि ज्ञानाचा । मार्ग सुधारावा जीवनाचा । धर्म साधावा कुटुंब -राष्ट्राचा । याचसाठी सावधान ॥२६॥
प्रकृतीचा संयोग दिला । व्यक्तीने कुटुंबरूपे विकास केला । तेणे घराचा भाग पडला । अंगावरि ॥२७॥
कैसे घडेल उद्योग करणे । आपुला सर्वाचा निर्वाह साधणे । लग्नसंस्कारे लाविली बंधने । समाजधर्माची ॥२८॥
एकपत्नीव्रता घ्यावे । वाईट कुणाकडे न बघावे । हेच निश्चयाने शिकवावे । लागे तया ॥२९॥
काही घडता दुर्व्यवहार । कलंक लागे घराण्यावर । म्हणतील मुलगा कुलांगार । जन्मा आला ॥३०॥


याच कारणासि जपावे । सात्विक मार्गा अवलंबावे । संती सांगितले जे बरवे । तेचि करावे सर्वथा ॥३१॥
एकांती लोकाती स्त्री पाहोन । होऊ न द्यावे वृत्तीचे उत्थान । प्राण गेलियाहि अमोल जीवन । खोवू नये कुमार्गी ॥३२॥
एका पत्नीसि शास्त्रे नेमिले । ऐशा गृहस्थाश्रमी राहिले । तरी तो ब्रह्मचारीच म्हणविले । पाहिजे आम्ही ॥३३॥
गृहस्थाश्रम जरी घेतला । पथ्याने विषयी वागला । तरी तो ब्रह्मचारीच समजला । जातो गृहस्थ ॥३४॥
त्यासाठी उभयतांनी पाळावा संयम । कारणाविण नको समागम । येरव्ही आपले व्रतनियम । दोघांनीहि आचरावे ॥३५॥
संतानाकरिताच वीर्य देणे । येरव्ही आपुले ब्रीद रक्षिणे । ऐसे साधले जीवन ज्याने । महान तपस्वी ॥३६॥
अहो ! लग्न जरी केले । तरी विषय -दास्य नाही सांगितले । जन्म निभवावयासि मिळविले । साथीदार लग्नाने ॥३७॥
जिंकावया कामवृत्ति । पत्नी, नव्हे वाढवाया ती । उत्तममार्गे मिळवावी संपत्ति । तीहि आसक्ति जिंकाया ॥३८॥
जीवन -शक्ति एक झाली । तेणे सुकीर्ति प्रकाश पावली । सतकार्य -कळी उमलो लागली । ऐसे व्हावे ॥३९॥
सुख व्हावे मातापित्यासि । बंधुभगिनी आणि इतरासि । वागण्याची रीति ऐसी । मोह पाडी सर्वाना ॥४०॥


मोकळे बोलणे गोजिरवाणे । चाल चालणे चारित्र्याने । जीवन कंठणे उज्ज्वलतेने । थोरामोठयांचे पाहूनि ॥४१॥
संतॠषींनी कथिले ज्ञान । त्याचे करणे अध्ययन । यानेच फिटेल ॠषिॠण । गृहस्थाचे ॥४२॥
संतान करावे आदर्श साचे । तरि ॠण फिटे मातापित्याचे । अथवा आपणचि नाम वाढवावे तयांचे । देशसेवेने ॥४३॥
विश्वी देव जाणूनि सेवावा । तोचि वैश्वदेव बरवा । प्राणीमात्रासि वाटा द्यावा । हाचि यज्ञ पावन ॥४४॥
यानेचि फिटे देवॠण । गृहस्थाश्रमी सर्वाचे जीवन । संतोषवावे दीन दुःखी जन । सेवाभावे ॥४५॥
उचित करावी कुटुंबसेवा । जीवसेवा, ग्रामसेवा । ध्यानधारणेचा ठेवा । त्रिकाळ नेमिला सर्वासि ॥४६॥
गृहस्थाश्रमी ऐसे वर्तले । अतिमहत्त्व जीवना आले । साधुसंती गौरविले । ऐशा गृहस्थाश्रम ॥४७॥
असो कोणताहि आश्रम । त्यात मुख्य असे संयम । विकासाचा वाढता क्रम । त्यागबुध्दीच्या ॥४८॥
गृहस्थासि संतान झाले । उपभोगाचे पारणे फिटले । पुढे संस्कार बळावले । त्यागवृत्तीचे ॥४९॥
आपुली असली -नसली हौस । वाहे मंद सावकाश । सुख व्हावे पुत्ररत्नास । वाटे पित्यासि ॥५०॥
आपणासि आवडे घास । तो राखून देई तयास । दुसर्‍याच्या सुखार्थ भोगी त्रास । हे शिक्षण गृहधर्मी ॥५१॥
त्याच्या गुणात आपुले भुषण । त्याच्या कीर्तीत समाधान । तो वाईट होता दुषण । लागेल आम्हा ॥५२॥
ऐसी धरोनि दूरदृष्टी । व्हावे लागे त्यासाठी कष्टी । प्रसंग पडता उठाउठी । धावूनि झेली स्वतःवरि ॥५३॥
परि आपुल्या पुत्राकारणे । कोणावरि अन्याय न करणे । आपुल्या ऐसीच समजणे । मुले सर्वाची ॥५४॥
सर्वाकरिताच झटावे । ऐसे व्यापकपण साधावे । हेच गृहस्थाश्रमी शिकावे । लागे तत्व ॥५५॥
पुत्रावरि दया करी । तीच दासदासीवरि । पंक्ति प्रपंच नाही अंतरी । तोचि धन्य गृहधर्म ॥५६॥
पुत्र शिकून मोठा झाला । एक होता दुसराहि जन्मला । तिसरा होताचि संसार संपला । पाहिजे पित्याचा ॥५७॥
न संपता मग यातना । भोगाव्या लागताति नाना । वानप्रस्थाश्रम म्हणोनिच जाणा । योजिला धर्मसंस्कारे ॥५८॥
ऐसे जयाने साधले । त्यासीच ” पुरूष ” म्हणणे शोभले । येरव्ही ते विषयी झाले । गधे घोडे वानर ॥५९॥
मी तो ऐसे नवल पाहिले । एकाने चाळीस विवाह केले । त्यास साठ पुत्र झाले । ते राहिले शेतावरि ॥६०॥


एका शेतावरि एक पत्नी । चिमण्या हाकली महाराणी । लग्न म्हणजे आमदानी । जंगलीजेठांची ॥६१॥
असा हा संसाराचा तमाशा । वारे संसाराची आशा । सगळया आयुष्याची दुर्दशा । वासनेपायी ॥६२॥
काही दोनचार स्त्रिया करिती । आयुष्य सर्वाचे नागविती । ही तो आहे पशुवृत्ति । गृहस्थाश्रम म्हणो नये ॥६३॥
पुरुषा बहुपत्नीचा अधिकार । स्त्रियांनी का न करावे चार ? हा दुर्गतीचाचि विचार । दोघांचाहि ॥६४॥
एका स्त्रियेसि दहा पति । अजूनहि कोठे असे ही रीति । त्या माऊलीची कोण गति । देव जाणे ॥६५॥
हा सर्व अज्ञानाचा पसारा । वाढवाल तेवढा वाढे भारा । म्हणोनि आळा या विकारा । घातलाचि पाहिजे ॥६६॥
एकदा एक पत्नी केली । पुढे पत्नीची भाषाचि संपली । तरीच दोघांनाहि लाभली । शांति संसारी ॥६७॥
संसार सदाचाच अपूर्ण । विकारी नसे समाधान । ऐसी गाठी बांधोनि खूण । विचारे सुख साधावे ॥६८॥
दोघांचे व्हावे एक मन । तेथेचि नांदे स्वर्ग पूर्ण । होता आदर्श संतान । पांग फेडील देशाचा ॥६९॥
यावरि श्रोती विचारले । संतानासाठी लग्न नेमिले । परि एका स्त्रियेसि संतान न झाले । म्हणूनि केले दुजे लग्न ॥७०॥
त्यासि निषधिले आपण । आता सांगा न होता संतान । कैसे फिटू शकेल ऋण । देशाचे आणि वडिलांचे ? ॥७१॥
लग्न केलियाहि वरि । पुत्र न होता उदरी । म्हणती त्यास अधोगति सारी । प्राप्त होते ॥७२॥
याचे उत्तर यथार्थ ऐका । हा समजचि वेडयासारखा । सेवेने ज्ञानाने मुक्तिसुखा । प्राप्त होतो कोणीहि ॥७३॥
पुत्र न होताचि एक । संन्यासी ब्रह्मचारी कित्येक । तरले ऋषिमुनि संत देख । बुडाली अनेक श्वानसूकरे ॥७४॥
” निपुत्रिकास अधोगति ” । ऐसे जे ग्रंथवेत्ते म्हणती । त्यांच्या म्हणण्याची निष्पत्ति । दुसरी होती ॥७५॥
भारती ऐसा काळ आला । संन्यास देती ज्याला त्याला । महत्त्व न द्यावे लग्नकार्याला । ऐसे झाले ॥७६॥
ज्याने त्याने तप करावे । ऐसे धरले बहुतांच्या जीवे । म्हणोनि हे बंधन घालावे । लागले ग्रंथकर्त्या ॥७७॥
पुत्र व्हावा कुल -उध्दारी । येरव्ही ती वाझंचि बरी । ऐसेहि बोलिले निर्धारी । ग्रंथामाजी ॥७८॥
यातूनि हाच निघे सार । समाजधारणेसाठी संसार । पुत्र नसताहि होतो उध्दार । प्रयत्नशील गृहस्थाचा ॥७९॥
समाजाच्या उनत्तीचे सुत्र । खंडू न द्यावे सर्वत्र । यासि पूरक तोच योग्य पुत्र । बाधक तारि ती अधोगति ॥८०॥


” पापपुण्य आपुले आपणा । पुत्रबंधु न तारी कोणा । ” ही ग्रंथांची सत्य घोषणा । विसरू नये कोणीहि ॥८१॥
एक पुत्र जरी नसला । सर्व पुत्र आपुलेचि म्हणाला । सर्वाच्याहि उपयोगा झाला । तरि झाला उध्दार त्याचा ॥८२॥
असेल मुलासाठी धन । करावे सत्कार्यासि अर्पण । यात भावना ठेवू नये भिन्न । तरीच पावे सदगति ॥८३॥
आपुले घरचि नव्हे घर । विश्व आपुले मकान सूंदर । हेचि शिकावया असे संसार । उध्दार तो याच मार्गे ॥८४॥
ऐसा करावा पूर्ण विचार । दोघांनी आपुले शोधोनि अंतर । दूरदृष्टीचा साधावा व्यवहार । पुत्र असले नसले तरी ॥८५॥
मन काढावे घरातूनि । पुत्रास जबाबदारी समजावोनि । पुत्र नसता गावास अर्पूनि । देशाटनी निघावे ॥८६॥
निघावे पत्नीस घेऊनि । जी धर्मअर्थकामी सांगातिणी । ती जरि साथ न दे मोक्षसाधनी । पुत्राजवळी राहू द्यावे ॥८७॥
पत्नी जरी देई सहयोग । तरी जीवनी वर्जावा भोग । दोघांनाहि अंगी बाणवावा त्याग । निश्चयाने त्यापुढे ॥८८॥
कार्य संपले संसाराचे । पुढील जीवन वानप्रस्थाचे । मिळोनी तपाचे सदवर्तनाचे । धडे पाळावे दोघांनी ॥८९॥
पाहावी विशाल स्थाने मंदिरे । तीर्थे वने मुनि -कुटीरे । अनासक्त व्हावया मने शरीरे । चित्त लावावे सत्कार्यी ॥९०॥
सर्वकार्यासि वाहून घ्यावे । अध्यात्मभावा अनुभवीत जावे । आणिकासहि धडे द्यावे । शिकवावा सेवाभाव ॥९१॥
सेवेसाठी घ्यावी दीक्षा । न्यावी लया गावाची अवदशा । काम करावे भरूनि हर्षा । सर्वासाठी अंतरी ॥९२॥
शिक्षणसंस्था, आश्रमसंस्था । सत्संगसंस्था परमार्थसंस्था । यांची करावी सर्व व्यवस्था । शांतीसाठी ॥९३॥
अंध पंगु महारोगी । अनाथ आणि वॄध्द जगी । आश्रम चालवावे जागजागी । त्यांच्या सेवेचे ॥९४॥
गृहस्थाना वेळ न फावे । म्हणोनि वानप्रस्थे लक्ष द्यावे । मुलाबाळासि संगोपावे । ब्रह्मचारि रक्षूनि ॥९५॥
द्यावे जीवनाचे शिक्षण । जेणे कार्यकर्ते निघतील पूर्ण । सर्वांगीण उन्न्तीचे ज्ञान । द्यावे तया आश्रमस्थानी ॥९६॥
हे कार्य वानप्रस्थाने करावे । घरादारांचे बंध तोडावे । अनासक्तीने वागावे । सेवेसाठी सर्वाच्या ॥९७॥
नुरता संसारात वासना । वैराग्य येते सहज वर्तना । उरले ते हेचि कार्य जाणा । शिक्षण द्यावे सर्वासि ॥९८॥
ग्रामसेवाचि देशसेवा । देशसेवाचि ईश्वरसेवा । हेचि अनुभवावया जीवभावा । वानप्रस्थ आश्रम ॥९९॥
तिसरा वानप्रस्थ आश्रम । हा संन्यासाचा उपक्रम । व्हावया वासनेचा उपशम । अंतरामाजी ॥१००॥


पुढे आहे संन्यासधर्म । वानप्रस्थाचा तोडण्यासि भ्रम । अनुभवूनि आत्माराम । वृत्ति उपराम कराया ॥१०१॥
जेव्हा घरातूनि मन निघाले । सर्वदेशी होऊनि सेवे लागले । संन्यासवृत्तीने क्रमे साधले । परमात्म्य अंगी ॥१०२॥
संन्यासी शिकवी वानप्रस्थासि । शेवटी स्थितप्रज्ञता कैसी । प्राण गेल्याहि आसक्क्तीसि । स्पर्श मुळी होईना ॥१०३॥
वानप्रस्थी संसार त्यागला । संन्यस्ती स्वरूप योग झाला । परम रस वृत्तीने चाखला । धागाचि खुंटला आसक्तीचा ॥१०४॥
कळला आत्मा -परमात्मा सकळ । जीव -ब्रह्म कैवल्य केवळ । प्रज्ञावॄत्ति होय निश्चळ । स्वरूपामाजी ॥१०५॥
ही स्थितप्रज्ञता अंगी मुरली । त्यासि जीवन्मुक्ति लाभली । याचि देही त्याने साधली । पूर्ण सफलता जीवनाची ॥१०६॥
तो सकळा झाला स्फूर्तिदायक । निःस्पृहतेने मार्गदर्शक । जीवनदृष्टी देई सम्यक । सर्व जगाला ॥१०७॥
हेचि सत्य -धर्माचे ध्येय । हेचि सर्व कर्मांचे श्रेय । सर्व ग्रंथाचे हेचि तात्पर्य । तुकडया म्हणे ॥१०८॥
इति श्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र -स्वानुभव संमत । तिन्ही आश्रम निरूपिले येथ ।
तिसरा अध्याय संपूर्ण ॥१०९॥
 
ग्रामगीता अध्याय तिसरा समाप्त
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading