
सहारा नावाचा एक परगाणा होता. तेथून मोरनगावकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जात होता. त्या मोरनगावाकडे एक छोटासा कफिला मराठे आणि मोगलांच्या हल्ल्याचाच्या भीतीने लपून-छपून जात होता. एका पालखीत आजारी राजा चंपतराय छत्रसालचे वडील…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – २६.
छत्रसालांचे जीवन म्हणजे संघर्षाची कधीच न संपणारी कहाणी आहे. ते आपल्या प्रिय बुंदेल खंडाच्या भूमीला सावरण्याचा प्रयत्न करतात, तोच दुसरे नवीन संकट येऊन उभे राहते. पण छत्रसाल अविरत न थकता जोपर्यंत बुंदील खंडांच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित करून घेत नाही तोवर ते थांबणार नाही. येत असलेल्या आव्हानामुळे बळ मिळते. दिशा मिळते.
लगेच नवीन आव्हान त्यांचे समोर आले. सकाळी सकाळी हीरदेशहा काका अंगद बरोबर घाईघाईने छत्रसालांचे बैठकीत प्रवेश केला. अरेऽ, इतक्या सकाळी? काही विशेष? होय! तशीच महत्त्वाची बातमी आहे. मऊ घाट आणि दरसेडा जवळ मोहम्मद बंगषच्या सैन्याच्या हालचालीची सूचना मिळाली. फारूक सिअर पदच्युत झाल्यापासून मला खटका होताच. सय्यद बंधूंनी मोहम्मदला दिल्लीच्या सिंहासनावर बसवले. या नवीन बादशहाशी आपले संबंध ना सलोख्याचे, ना वाईट आहे. केंद्रीय सत्ता कमकुवत झाल्याची संधी साधून बंगषने लढाईचा पवित्रा उचलला असावा. छत्रसाल काळजीत पडले.
छत्रसाल म्हणाले, आपण काहीतरी उपाय केला पाहिजे. ते अंगदला म्हणाले, तुम्ही हिरदेशाहला घेऊन सीमेवर पोहोचा. मी रतन दादांशी चर्चा करून पुढची कार्यवाही ठरवतो.
दोन दिवसांनी पाच हजार पायदळ सैन्य आणि दोन हजार घोडेस्वार सैन्य घेऊन अंगद आणि हिरदोसाह निघाले.
रतनशहा आल्यावर छत्रसालने त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली. आधी बादशहा फारुक सिअरने दिलेल्या आश्वासनाला काही अर्थ राहिला नाही. तोच नवीन बादशहाच्या हातचे बाहुले झाला होता. म्हणून बंगेष मनमानी करत मागच्या बादशहाने त्याला दिलेल्या इलाक्यावर कब्जा करण्यासाठी तो ससैन्य आला आहे. याचा अर्थ आपल्याला त्याच्याशी सरळ लढत द्यावी लागेल. बंगष मोठा सेनापतीच नाही तर, तो जबरदस्त योद्धा आहे. आपल्याला चांगली तयारी करावी लागेल. हिरदेशाह त्याच्या मुकाबला करू शकणार नाही. शेवटी दोघांच्या संमतीने बंगषशी लढा देण्याचे ठरवले. त्यादृष्टीने सैन्याचे नियोजन होऊ लागले. त्यांनी चंदेरी, दतिया आणि ओरछा राजांना सहयोग देण्यासाठी पत्र पाठवले. या लोकांनी आतापर्यंत छत्रसालांना विरोधच केला होता. पण आता मोगल सत्ता कमकुवत झाल्याने शिवाय ते बंगषला भीत असल्याने छत्रसालच्या संरक्षणातच त्यांना आपले हित आहे हे कळून चुकल्याने, तिघांनी आपले सैन्य पाठवायला तयार झाले.
छत्रसाल सगळे सैन्य घेऊन हमीदपूर जवळ शहरापूरला जाऊन पोहोचले. तिथे बंगषचा सेनापती दिलेरखानला छत्रसालचा पराक्रम माहीत असल्यामुळे तो न लढताच सोहरापुरातून अलोनकडे पळून गेला. छत्रसालने त्याचा पिच्छा सोडला नाही. कसेही करून त्यांना दिलेरखानचे सैन्य नष्ट करायचे होते. म्हणजे तो पुन्हा बुंदेलखंडाकडे पाहणार नाही.
शेवटी दिलेरखानशी युद्ध झाले. दिलेरखान मारल्या गेला. यावेळी बंगष बुंदेलखंडापासून दूर जोधपूरचे राजा अजित सिंह विरुद्धच्या मोहिमेत व्यस्त होता. याचा फायदा छत्रसालांनी घेऊन बुंदेलखंडाच्या सर्व चौक्या, ठाणे मजबूत केल्या. जवळपासचे प्रांत आपल्या राज्यात मिळवले. सुभ्यांकडून धन वसूल केले. युद्धकोष समृद्ध केला. ते जाणून होते, बंगष पराजयाचा बदला घेईल.
शेवटी झाले तसेच. अजित सिंहाचे प्रकरण संपवून बंगष अलाहाबादला आला. बादशहाच्या मदतीने मोठे सैन्य घेऊन छत्रसालवर आक्रमण करण्यासाठी यमुने काठी भोगिनीपूरवर मुक्काम केला. यमुनेला पूर असल्यामुळे त्याला थांबावे लागले. दुसऱ्या काठावर जगतराज आणि हिरदेशाह होते. पूर ओसरल्यावर दोन्ही सैन्यात घनघोर युद्ध झाले. बुंदेलांनी महत्त्वाच्या ठिकाणी मोर्चे लावले असल्या मुळे, बंगषचा पराभव झाला. त्याने छत्रसाल बरोबर तह करून ग्वाल्हेरकडे निघून गेला.
सीमा रक्षणासाठी काही सैन्य ठेवून, छत्रसाल पन्नाला परत आले. सैन्याची पुनर्रचना, नवीन सैन्य भरती, सैन्य प्रशिक्षणाची व्यवस्था, नवीन तोफा बनवणे, बंदुकी खरेदी करणे ही सगळी कामे त्यांनी अंगदकडे सोपवली. सुभे, ठाणे आणि परगण्यांसाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुकी केल्या. युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या परिवाराला नोकर्या दिल्या. बंगषवर लक्ष ठेवण्यासाठी काही शोधपथके पाठवले.
एके दिवशी काही बेघर लोक छत्रसालांना भेटायला आले. त्यांच्यात मध्यम वयाचे स्त्री, पुरुष व एक सुंदर मुलगी होती. छत्रसालने विचारले, काय नाव या मुलीचे? मस्तानी! प्रौढ स्त्री म्हणाली, आमचा पेशा कलावंतीणीचा. आम्ही सिहुडच्या जवळ एका वस्तीत राहतो. महम्मद बंगषचे लोक सिहूडापर्यंत धावा बोलत आहेत. लोकांकडून जबरदस्तीने अन्न, पैसे गोळा करतात. स्त्रियांना जबरदस्तीने उचलून नेतात. त्यामुळे आम्ही खूप घाबरलो आहोत.
छत्रसाल म्हणाले, घाबरू नका. सैनिक कार्यवाही केल्या जाईल. पण सरकार आम्ही बैलगाड्यात सामान भरून गाव सोडून आपल्या आश्रयाला आलो आहोत. हमरा नावाची ती बाई विनवण्या करू लागली. तो जमाल नावाचा प्रौढ पुरुष म्हणाला, मुलीची काळजी आहे सरकार. रात्रभर झोप येत नाही. छत्रसाल आश्वासन देत म्हणाले, मस्तानी आजपासून माझी मुलगी आहे. तिच्या सुरक्षितेची व्यवस्था केली जाईल. छत्रसालने एका सेवकाला बोलावून सांगितले या लोकांना दिवाणकडे नेऊन राहण्याची व्यवस्था करायला सांग. यांना इतर लोक भेटणार नाही याची दक्षता घ्यायला सांगा. हमरा म्हणाली, मस्तानी शास्त्रीय व इतर नृत्यात प्रवीण आहे. तिला दरबारात जागा मिळाली तर, तिचे नशीब बदलेल. सरकार एकच विनंती आहे, जमाल म्हणाला, मलाही थोडेफार शस्त्राचे ज्ञान आहे. आपल्याबरोबर युद्धात राहू इच्छितो. सोबत हमरा आणि मस्तानी राहतील. आपण अनुमती द्यावी. छत्रसाल म्हणाले, विचार करून सांगू…
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – २७.
जगत राज आपल्या दालनात गेल्यावर, त्यांची पत्नी जैतकुवारीला म्हणाला, आज दरबारात अति लावण्यवती मस्तानी नावाची मुलगी आली होती. तिला राजदरबारात नर्तकी की म्हणून ठेवण्यास महाराजांनी मनाई केली. जैतकुवर म्हणाली, तुम्हाला इतरांच्या कलेची फिकर आहे. आणि आपल्या पत्नीच्या कलेबद्दल अनभिज्ञ आहात. मी शस्त्रकलेत प्रवीण आहे. माझ्या बाबांनी मला युद्ध क्षात्राणीच्या रूपात प्रशिक्षित केले. अश्वरूढातही प्रवीण आहे. इतके युद्ध होतात, पण मला रण कौशल्य दाखवण्याची संधी दिली जात नाही. मला माहित नव्हते. आता तर माहित झाले ना? आता होणार्या युद्धात घोडदळात मला सामिल करून घ्यावे. अरेऽ, हे कसे शक्य आहे? हा निर्णय महाराजच घेऊ शकतील. ठीक आहे. मीच त्यांच्याशी बोलते.
दुसऱ्या दिवशी जेवण झाल्यावर, छत्रसालांना पानाचा विडा देताना जैतकुंवर म्हणाली, बाबा, मला आपल्याशी बोलायचे आहे. बोल बेटा.. मग तिने आपण युद्ध कलेत निपुण असल्याचे सांगून, होणाऱ्या युद्धात मला संधी द्यावी अशी विनंती केली.
छत्रसाल म्हणाले, ऐकून आनंद झाला .व तुझ्या धाडसाचे कौतुक वाटले. पण जोपर्यंत छत्रसालाच्या हातात तलवार आहे तोपर्यंत तुझ्या हाताची मेहंदी फिकी होऊ देणार नाही. मग मला छावणीत राहण्याची परवानगी द्यावी. परिवारातील कुणी जखमी झाले तर त्यांची देखभाल करता येईल. ठीक आहे. तयार रहा. बाबा, एका क्षात्राणीच्या रूपाने बुंदेलखंडाच्या मानमर्यादेसाठी बलिदान देण्याच्या भावनेवर मी कायम राहू शकेल असा आशीर्वाद असू द्या. जेतकुंवरीचा चेहरा अनोख्याते तेजाने उजळला.
छत्रसालकडे बातमी आली की, मोहम्मद शहा चा मुलगा अकबर शहाने यमुनेच्या उत्तरेला मोठी फौज घेऊन आला आहे. तो पूर ओसरण्याची वाट पाहत आहे. छत्रसालने हिरदेशहाला बोलावून पूर्ण तयारीने इचौलीच्या सीमावर्ती भागात जाऊन मोर्चा सांभाळण्याचा आदेश दिला.जगतराजला सिंहुडाजवळ पोहोचण्यास सांगितले. अकबराचे सैन्य यमुनेच्या अलीकडे येणार नाही ही काळजी घ्या. आले तरी बुंदेलखंड्याच्या क्षेत्रात प्रवेश करणार नाही ही दक्षता घ्या. आम्ही स्वतः मोठे सैन्य घेऊन मागोमाग येतोच आहे.
हिरदेशाह सैन्य घेऊन इचौलीला जाण्याऐवजी बघेल खंडावर हल्ला करून राजमहालाला घेराव घातला. राजकुमारीचे अपहरण करून तिला एका सैनिकी तुकडी बरोबर पन्नाला पाठवले. बघेल खंडाच्या राजवंशावर हा मोठाच आघात होता. छत्रसाल कडून अशा दुष्कृत्याची अपेक्षा नव्हती. छत्रसालचे आणि त्याचे मैत्रीचे नाते होते. छत्रसालने आश्वासन दिले होते बघेल खंडावर कधी स्वारी करणार नाही. नंतर हरदेशाह इचौलीला पोहोचून तिथे मोर्चा सांभाळला. बघेल खंडाची राजकुमारी पन्नाला पोहोचवली होती, तेव्हा छत्रसाल कूच करण्याच्या तयारीत होते. त्यांना जेव्हा कळले की, मित्र राजावर आक्रमण आणि राजकुमारीचे अपहरण करून तिला पन्नास आणले. छत्रसाल अतिशय क्षुब्ध झाले. हीरदेशाह समोर असतात तर….?
ते राजकुमारीला म्हणाले, मला अतिशय खेद आहे आमच्या सैन्याने तुमच्या राज्यावर आक्रमण केले. शिवाय तुमचे अपहरण करण्याचा उद्धटपणा केला. मी तुम्हाला आदराने रीवाला सोडण्याची व्यवस्था करतो. राजकुमारी म्हणाली, आपल्या शौर्याबद्दल बरेच ऐकले होते आज आपले औदार्य पाहिले. एका अपह्रत मुलीचा घरी गेल्यावर काय मान राहील? आपले ज्येष्ठ पुत्र हिरदोशहा मला भेटून झालेल्या घटनेबद्दल क्षमा मागून म्हणाले, माझ्या मोठ्या भावाशी आपले लग्न लग्न करू इच्छितात. पराजित राज्याची कन्या काय बोलणार? प्रतापी ऐश्वर्यशाली, स्वाभीमानी आणि उदार महाराज छत्रसालांची सून होण्याचा मला गौरव प्राप्त होत असेल तर, ज्या उद्देशाने मला इथे आणले गेले तो पूर्ण व्हावा. संकोचाने राजकुमारी म्हणाली.
जगतराजशी तुमचे लग्न… आम्ही धन्य झालो. हे युद्ध संपल्यावर हे मंगल कार्य होईल. तोपर्यंत तुम्ही पन्नाच्या राजमालात जगतराजची वाग्दत्त वधू म्हणून सन्मानाने राहावे.
दुसऱ्या दिवशी सैनिकांना कूच करण्याचा आदेश दिला. त्यांच्या गैरहजेरीत पन्नाच्या सुरक्षिततेची जबाबदारी अंगद आणि मुलगा भारती चंद्रावर सोपवली. तेवढ्यात बातमी आली, महंमद बंगष प्रचंड सेनेसह यमुना पार करून त्याने बघेल खंडातून बुंदेल सैन्यकांना हाकलून लावले. आणि कुक, चौखंडी ककरेली, कल्याणपुर आणि रामनगर वर कब्जा केला असून, त्याने वीरासिंहपूर आणि माधोगड मध्ये चौक्या बसवल्या. बांदाजवळचा २०० मैल परिसरात त्याच्या सैन्याचा कब्जा आहे. त्यांना रोखण्यासाठी महाराजांनी मोठे सैन्य घेऊन तात्काळ पोहोचावे, छत्रसाल गंभीरपणे विचार करू लागले, एवढ्या मोठ्या बंगषच्या सैन्याला रोखण्यास कोणाची मदत घ्यावी? सध्या बंगषच्या बरोबरीची टक्कर फक्त बाजीराव पेशवेच देऊ शकतील. ते आपली मदत करतील का? जयसिंग मराठ्यांशी लढत होता तेव्हा त्याला मदत करण्यासाठी आपण मराठ्यांविरुद्ध लढलो हे ते कसे विसरतील? आपले सारे सैन्य ठीक ठिकाणी विखुरले आहेत. एवढ्या अल्प सैन्यानिशी बंगषचा सामना कसा करणार? शेवटी पेशव्यांना मदत मागण्याचे ठरविले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या त्यांची शक्तिशाली सेना माळव्यात असल्यामुळे, ते आपल्यापर्यंत लवकर पोहोचू शकेल. छत्रसालांनी पत्र पाठवून पेशव्यांना मदतीची साद घातली. संदेश वाहक बरोबर पेशव्यांना पत्र पाठवून छत्रसाल आणि अंगद मोर्चा सांभाळायला तराहनला पोहोचण्यासाठी त्वरेने निघाले. तिथे बुंदेलांची सर्वात मोठी छावणी होती. ती वाचवणे जरुरीची होते.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – २८.
छत्रसाल अजून वाटेवरच होते, तिकडे हिरदेशाह व जगतराज वेगवेगळ्या मोर्चावर लढत होते. बंगष एकापाठोपाठ एक एक प्रांत ताब्यात घेत होता. बुंदेलखंडात आत शिरण्याचा प्रयत्न करीत असताना बुंदेले जबरदस्त लढा देत होते. छत्रसाल इचौली छावणीत पोचले, तेव्हा बंगष तेथपर्यंत आल्याची सूचना मिळाली.
रजतराज छत्रसालांना भेटायला येऊन त्याने सांगितले, आपली सगळीकडून माघार होत आहे. बंगषचा भाऊ हादीदाद खान आणि मुलगा कायमखानने मोठ्या सैन्यानिशी तारहनावर हल्ला करून ताब्यात घेतला. आम्ही त्याला थोपवण्याचा भक्कम प्रयत्न केला पण आमच्या सैन्याचे खूप नुकसान झाले. आता तो इचौलीच्या जवळ आला आहे.
छत्रसाल म्हणाले, पेशवे बाजीरावांकडून अजून पत्राचे उत्तर आले नाही. अरेऽ हो! सुनबाई जैतकुंवरी सध्या कुठे आहे? जयपुरच्या गडावर ठेवले आहे. ठीक आहे. आता युद्धाची तयारी करा. बंगषला इचौलीच्या पुढे येऊ द्यायचे नाही. इचौलीच्या थोड्या अलीकडे चर खणा, म्हणजे त्याचे सैन्यांना अडथळा निर्माण होईल.
छत्रसालांनी आदेशाप्रमाणे लांब खोल दरी खाणल्या गेली. तरीही बंगेषचे सैन्य पुढे येतच होते. त्याने झाडे कापून दरी बुजवण्याच्या सैनिकांना आदेश दिला. समोरासमोर युद्ध सुरू झाले. भारी नुकसान होऊनही मोगल सैन्याला मागे हटवू शकले नाही. बंगषचे दोन सेनापती मारले गेले. शेवटी युद्ध बंगष जिंकला, पण नुकसानही भरपूर झाले होते. त्याचे जवळ फार थोडे सैन्य राहिले होते. रसद आणि पाण्याची टंचाई. मोहिम पुढे चालवणे कठीण होते. तरीसुद्धा त्याने छसालाचा पाठलाग करत, सालहट मध्ये बुंदेल सैन्यावर तुटून पडला. त्याने बारीगड आणि झुमरचे गड नष्ट केले. बुंदेलांना श्वास घेण्याची ही उसंत मिळाली नाही. ते महोबांकडे पळाले. तोपर्यंत पावसाळा सुरू झाल्यामुळे, बंगषला थांबावे लागले. छत्रसालांना पावसाळा वरदान ठरले. त्यांना सैनिकांची जुळवाजुळव करायला अवधी मिळाला.
पुढच्या युद्धासाठी महोबाचे डोंगर निवडले. पुढील चर्चा करण्यासाठी बैठक भरवली. छत्रसाल म्हणाले, पुढचा कोणताही पराभव बुंदेलखंडांच्या अस्तित्वावर प्रहार होईल. आपले एकाच वेळी बरेच मोर्चे सुरू असल्यामुळे सैनिक शक्ती विखुरल्या गेली. इलाज नाही. बंगषनेही अनेक ठिकाणी मोर्चे बांधले आहे. त्यामुळे त्याचा प्रतिकार करणे भाग आहे. आपण हिम्मत हरायची नाही. निराश व्हायचे नाही. आपला पुरुषार्थ सोडायचा नाही. नशीब कधी बदलेल सांगता येत नाही. मला वाटते पेशवे बाजीरावांना पुन्हा पत्र पाठवून त्यांची मदत मागावी. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीच दिसत नाही. छत्रसालांच्या स्वरात औदासिन्य होते. त्यांनी आजपर्यंत सगळे युद्ध स्वबळावर जिंकली होती.
छत्रसालांनी पेशवे बाजीरावांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख करून, विनंती केली, स्वतंत्र बुंदेलखंड राज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी, आपण येऊन बंगषच्या आतंकापासून मुक्ती मिळवून द्यावी. नुकसान भरपाई म्हणून आमचा राज्य आणि राज्य कोषाचा एक तृतीयांश भाग प्रदान करू.
पत्र पाठवून छत्रसाल स्वस्थ बसले नाही. त्यांनी उरले सुरले सैन्य एकत्रित केले. दूर असलेले सैन्य महोबाकडे बोलावून घेतले. दाट जंगलात झाडेच्या मागे मजबूत ठिकाणी तयार करून तिथे सैनिक तुकड्या नेमल्या. युद्ध सामग्री व रसद पोहोचण्यासाठी व्यवस्था केली. बुंदेलखंडाचे अस्तित्व पणाला लागले होते. तिकडे बंगष सुद्धा स्वस्थ बसला नाही. त्याने झाडे तोडून रस्ता बनवला. बादशहाकडून मदत मागितली. स्वतः पदर मोड करून दोन लाख रुपये खर्च केले. पावसाळा संपल्यावर त्याने बुंदेल्याचा मोर्चा असलेला कुल पहाडावर वेगाने आक्रमण केले. बुंदेलेल्याचे सात तट आणि दोन गड उध्वस्त केले. जगतराज अटीटटीने बंगषचा सामना करू लागला. त्याला जाणीव होती की, बंगषला इथे थोपवले नाही तर बुंदिलांचा सगळ्यात मजबूत गड जैनपूरवर आक्रमण करेल. दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीचे घनघोर युद्ध सुरू झाले. पण जगतराजचा त्याच्यापुढे टिकाव लागला नाही. कुठून तरी भाला येऊन त्याचे कवच तोडले. नंतर दोन बाण लागल्यामुळे जखमी होऊन तळमळत घोड्यावरून खाली पडला. मोगलांच्या घोडेस्वारांनी आपल्या घोड्यावर जगतराजला टाकून जैनपुरकडे निघाले.
अंगरक्षकांनी किल्ल्यात जाऊन ही सूचना राणी जैतकुंवरला दिली. राणीने अंगरक्षकाची चांगलीच कान उघाडणी केली. राणीसाहेब, एक वेळा क्षमा करा. एक संधी द्या. ठीक आहे. चला माझे बरोबर. लगेच राणी सैनिक वेशात तयार होऊन शस्त्र घेऊन निघाले बाहेर निघाली. घोड्यावर स्वार झाल्यावर वर घोडा वायू वेगाने धावू लागला. अंगरक्षक रस्ता दाखवत राणीच्या वेगात आपला घोडा दौडत होता. अर्ध्या तासात मुगल सैन्याशी त्यांचा सामना झाला. घनघोर युद्ध झाले. एका झाडी जवळ जखमी जगतराज कण्हत पडलेले दिसल्यावर राणीने मोगल सैन्याचा प्रतिकार करत, जगतराज जवळ पोहोचली. अंगरक्षकांच्या साह्याने पतीला आपल्या घोड्यावर घेऊन, जैनपुरकडे भरधाव निघाली. जैनपुरच्या गडावर जाऊनच त्यांनी श्वास घेतला. जैतकुंवरीने आपल्या पतीला मृत्यूच्या दाढेतून काढून आणले होते. बुंदेलांनी तिचा जयजयकार केला.
तोपर्यंत छत्रसाल गडावर परत आले. त्यांना जैतकुंवरच्या धाडसाची पराक्रमाची बातमी कळल्यावर ते फार खुश झाले. वैद्याला सत्वर बोलावून जगतराजचे उपचार सुरू केले. छसालांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, तुझ्या अभूतपूर्व धाडसाचे खरच कौतुक वाटले. तुझा पराक्रम पाहून स्त्रियांनी सैन्यात भरती करायला हरकत नाही. जैतकुंवारीने त्यांना नमस्कार करत म्हणाली, आपला आदर्श मला सतत मार्गदर्शन करीत राहील. तिचा चेहरा विलक्षण तेजाने चमकत होता.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – २९.
जेव्हा मोहम्मद बंगषला कळले की, युद्ध मैदानातून राणी जैतकुंवरने आपल्या पतीला मोगलांच्या ताब्यातून सोडवून नेले, तेव्हा अतिशय संतप्त झाला. छत्रसाल सहकुटुंब जैनपुर गडावर आहे हे माहित झाल्यावर, त्याने गडाला मजबूत घेराव घातला. त्यामुळे आपल्या लोकांचा बाहेरच्या जगाशी संबंध तुटला. किल्ल्यात बरेचसे सैन्य होते. इतक्या लोकांना रसद पुरणार नव्हती. किल्ला मग फार दिवस लढवता येणार नव्हता. छत्रसाल म्हणाले, लढाई इतकी दीर्घकाळ चालेल असे वाटले नव्हते. त्याच्याशी लढाईत करताना आठ वर्ष संपले. कितीही हिम्मत असली तरी उपाशीपोटी धाडसाने लढाई केल्या जाऊ शकत नाही.
जैतकुंवारी म्हणाली, किल्ल्यात उपाशी मरण्यापेक्षा सगळी शक्ती एकवटून शत्रूवर तुटून पडावे. छत्रसाल म्हणाले, तो पर्याय शेवटचा आहे. थोडा धीर धरा. आपण पेशवे बाजीरावांना पत्र पाठवले आहे. बाजीराव दूरदर्शी आहेत. युद्धाचे बारकावे त्यांना माहित आहे. ते जाणतात. आम्हा दोघांचा उद्देश एकच आहे. मोगल शासन उपटून टाकणे. त्यांचे सैन्य इतक्यातच कुठेतरी असेल. त्यांना पक्की खात्री होती, बाजीराव मदतीला आल्याशिवाय राहणार नाही. फक्त वेळ लागेल. त्यासाठी त्यांना एक युक्ती सुचली.
छत्रसाल होळीचा सण रायते बरोबर मैदानात साजरा करत असे. हे निमित्त पुढे करत बंगषने अनुमती जर दिली तर, काम फत्ते होईल. त्याप्रमाणे त्यांनी बंगषला पत्र लिहिले. त्यात लिहिले, होळीचा पवित्र सण आमच्या कुटुंबासह सुरज मासला जाऊन, आपण अनुभूती दिली तर साजरा करावा. आणि आठ वर्षे लढून दोन्हीकडचे बरीच नुकसान झाले. आता आपण संधी करावी. तुम्ही जिंकलेल्या प्रांतावरचा आमचा हक्क सोडून देऊ. खबरदारी म्हणून आमच्या ठाण्यावर तुमचे काही सैनिक ठेवू शकता. होळीचा सण साजरा झाल्यावर लगेच आम्ही जैनपूरच्या किल्ल्यात परत येऊ. आपला निर्णय कळवावा.
पत्र वाचून बंगष विचारात पडला. त्यांनी मुलगा काममखानशी सल्लामसलत केली. त्याला हा प्रस्ताव मान्य नव्हता. त्याने हरकत घेतल्यावर, बंगष म्हणाला, छत्रसाल क्षत्रीय आहे. हे लोक शब्दाला जागतात. दिलेल्या मुदतीत नक्की परत येईल. मुलाने हरकत घेत म्हणाला, एकदा पिंजऱ्यातून पळालेला वाघ कधी परत येतो का? बंगष म्हणाला, जरा आपल्या परिस्थितीचा विचार करा. बादशहाला कित्येक वेळा फौज पाठवण्याविषयी, पैसे पाठवणे विषयी पत्र पाठवले. पण उत्तर आले नाही. असे ऐकण्यात आले की आपल्या संदेशवाहकांसाठी दरबाराची दारं बंद केली आहेत. अशा परिस्थितीत काय करणार? शिपायांना पगार द्यायला पैसा नाही. त्यांना चांगले जेवण देता येत नाही. कित्येक दिवसात रजा दिली नाही. एखाद्या राजावर आक्रमण करून चौक सुद्धा वसूल करता येत नाही. मग पैसा येईल कुठून? पैशाशिवाय कोणतेच काम होत नाही.
बंगष म्हणाला, हा डाव खेळून पहावा. समजा तो परत आला नाही तर, जैनपूरचा किल्ला सहज जिंकता येईल. तहाचे बोलणे तर तो आल्यावरच होईल. तोपर्यंत तू ताराहवनला जाऊन तिथली मोहीम सांभाळ.
बंगषने एक महिन्याच्या आत परत येण्याच्या अटीवर संदेशवाहकाच्या हस्ते स्वीकृती पाठवली. अनुमती मिळताच छत्रसाल आपल्या कुटुंबासह किल्ल्याच्या दक्षिण दारातून बाहेर पडले. काही सैनिक बरोबर घेतले. काही दिवसांनी राहिलेल्या सैन्याला सुरजमाऊला बोलावून घेतले. किल्ला रिकामा झाला.
होळीच्या सणाचे हे एक निमित्त होते. त्यांना बंगषच्या घेऱ्यातून निसटायचे होते. सुरजमाऊला आल्यावर, आल्या आल्या त्याने सैन्याचे पुनर्गठन केले. आसपासच्या राजांना मदतीसाठी पत्र पाठवलेत. प्रांता प्रांतातून चौथ वसुल केला.
पुढची रणनीती ठरवण्यासाठी बैठक घेतली. तेवढ्यात अंगद लच्छेरावत बरोबर येऊन प्रणाम करून म्हणाला, मिळालेल्या बातमीनुसार मराठा पेशव्यांच्या सैन्याने बुंदेलखंडात प्रवेश केला आहे. ऐकून छत्रसालांना आनंद झाला. सध्या त्यांचा मुक्काम राजगढला आहे. त्यानंतर ते महोबाला येऊन तुम्हाला भेटणार आहे. अंगद त्यांच्या स्वागताची तयारी करा. पेशव्यांना भेटून रणनीती ठरवून ताबडतोब अंमल करू.
होळीचा सण आटपून छत्रसाल ससैन्य महोबामध्ये पेशव्यांच्या छावणीत पोहोचले. बाजीरावांनी तंबू बाहेर येऊन त्यांचे स्वागत केले. छत्रसाल नम्रपणे म्हणाले, आपण हिंदुस्थानचे त्राता आहात. छत्रपती शिवाजींनी जी पवित्र मोहीम सुरू केली, ती तुम्ही अद्याप चालू ठेवली. धरतीवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार निवारणात आपली भूमिका महत्त्वपूर्ण आहे. बुंदेलखंडातर्फे आमचा नमस्कार स्वीकारावा. बाजीरावांनी त्यांना हाताने धरून तंबूत आणले. सर्व स्थानापन्न झाल्यावर, छत्रसाल म्हणाले, आपण आमच्या मदतीसाठी आलात याबद्दल कोणत्या शब्दात आभार मानू कळत नाही. स्वागताचे प्रतीक म्हणून ८० सुवर्णमुद्रा स्वीकार हव्या.
पेशवे म्हणाले, आम्हाला आधीच यायचे होते, पण आमचे सैन्य अजमेरच्या युद्धात गुंतले असल्यामुळे, जरा उशीर झाला. बरं झाले… बुंदेलखंडाचा सूर्य अस्त जाण्यापूर्वी आलात. छत्रसाल म्हणाले, चला आता, रणनीतीबद्दल बोलू. आता बंगेषचे सैन्य जैनपूर किल्ल्याच्या आसपास आहे. त्याचा मुलगा कयामखान तराहवन मध्ये मुक्काम करून बसला आहे. तेव्हा आपल्या सैन्याने त्याला घेराव घालून आक्रमण करावे.
बाजीराव म्हणाले, आमच्या माहितीप्रमाणे संध्या बंगष जवळ फार थोडे सैन्य आहे. दिल्लीच्या सुलतानाचा त्याच्यावर विश्वास राहिला नाही. त्यामुळे त्याला कोणतीच मदत करत नाही. अशावेळी ताबडतोब आक्रमण करणे योग्य होईल.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – ३०.
पेशवे बाजीराव आणि छत्रसालांनी सर्व बाजूने विचार विमर्श केल्यावर असे ठरले की, एका आठवड्याचे आत दोघांची सैन्य कूच करतील. अजमरच्या डोंगरावर जाऊन, पेशव्यांच्या सैन्याने मोर्चा सांभाळावा. बंगषच्या मुलाने कयामखान ने मोठ्या सैन्यानेशी जैनपूरकडे निघाल्याची सूचना मिळाल्यावर, पेशव्यांनी त्याच्या प्रतिकारार्थ तुकोजी पवार आणि देवजी सोमवंशीला सुपाकडे पाठवले. दोन्ही पक्षात घनघोर युद्ध होऊन कयाम खानला पराभूत करून हाकलून दिले. त्यात त्यांना ३००० घोडे आणि तेरा हत्तीची लूट मिळाली.
बाजीरावांनी बंगषच्या छावणीवर आक्रमण केले. दक्षिणेकडून छत्रसालने दबाव आणला. बंगषने शेवटी जैतपुरच्या किल्ल्यात आश्रय घेतला. पेशवे आणि छत्रसालांनी किल्ल्याला घेराव घालून बंगषचा बाहेरचा संबंध तोडून टाकला. थोड्याच दिवसात रसद संपल्याने बंगषची स्थिती फार वाईट झाली. पोटाची आग विझवण्यासाठी त्याचे सैन्य उंट, घोडे, खेचर यांना मारून खाऊ लागले. ते लपून-छपून बाहेरून पीठ मागत होते. सैनिक किल्ल्यावरून दोरीच्या साह्याने बालटी आणि पैसे सोडत. मराठी सैनिक हाडांचा चुरा मिसळून पीठ पाठवत. असे किती दिवस चालणार?
युद्धात शेकडो सैनिक, घोडे, खेचर यांची प्रेते सडू लागले. त्यात अधून मधून पाऊस पडला होता. त्यामुळे पटकी रोगाची साथ पसरली. मराठी सैनिकांना लागण झाली. रोज शेकडो सैनिक मृत्युमुखी पडू लागल्याने पेशवे बाजीराव काळजीत पडले.
त्यांनी छावणीत बैठक बोलावली. पेशवे छत्रसालांना म्हणाले, राजासाहेब, ही पटकी प्रलयासारखी आमच्या रोज शेकडो सैनिकांचा घास घेत आहे. वातावरण, पर्यावरण बघता इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर इलाज होणे शक्य नाही.
छत्रसाल म्हणाले, मी काय बोलू ? अजूनही बंगष पाय रोवून बुंदेलखंडात आहे. बाजीराव समजूत काढत म्हणाले, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही माझ्या वडिलांच्या ठाई आहात. तुम्हाला अशा परिस्थितीत सोडून जाण्याची बिलकुल इच्छा नाही. पण नाईलाज आहे. सैन्यांनी बंड पुकारले तर अनर्थ होऊन परिस्थिती हाताबाहेर जाईल. सध्या बंगष जैतपूरच्या किल्ल्यात एक प्रकारे कैदच आहे. त्याच्या सेनेपेक्षा तुमचे सैन्य जास्त आहे. त्याला तुम्ही एकटे तोंड देऊ शकाल. आम्हाला निरोप द्या. जशी तुमची मर्जी!
तुम्हीही माझ्या मुलांसारखेच आहात. छत्रसालांचे डोळे भरून आले. रणभूमीवर सदैव भावविहिन असणारे त्यांचे हृदय आज भावविव्हल झाले. नाही… नाही.. तुम्ही एवढे विव्हल होऊ नका. तुम्ही कितीही वेळा बोलवा आम्ही पुन्हा येऊ.
छत्रसाल म्हणाले, जाण्यापूर्वी तुमच्या सन्मानार्थ आमच्या छावणीत एक समारंभाचे आयोजन करू. तुम्हाला यावे लागेल. नंतरच निघू शकाल. इतक्या प्रेमाने दिलेल्या निमंत्रणाचा अस्विकार करण्याचा प्रश्नच नव्हता. बाजीरावांनी स्विकृती दिली.
२० मे १७२९ ला छत्रसालांनी आपल्या छावणीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात बाजीराव पेशवे, त्यांचे शूर सेनापती, सरदार सामील होते. मधे असलेल्या दोन सिंहासनावर बाजीराव आणि छत्रसाल बसले होते. तिथे नृत्याचा कार्यक्रम होणार होता.
रंगमंच तयार करण्यात आला. मंचाच्या उजव्या बाजूला वाद्यवृदांची बैठक व्यवस्था होती. मस्तानीने हंसगतीने प्रवेश केला. आणि रंगमंचाच्या मधोमध नृत्यमुद्रेत उभी राहून तिने मान्यवरांना मुजरा केला. व नृत्य सुरू झाले. तिचे नृत्य कौशल्य पाहून, नृत्यबद्दल फारशी जाण नसलेले प्रेक्षक सुद्धा आश्चर्यचकित झाले. बाजीराव पेशवे संगीताचे पारखी होते. मस्तानीचे नृत्य पाहून तिच्या नृत्यूनिपूनतेची जाणीव झाली. ते तल्लीन होऊन नृत्याचा आनंद घेऊ लागले. मस्तानी एकापेक्षा एक चटकदार तोडे विद्युत गतीने संचारित करत होती.
मस्तानी नृत्य करत असताना तिची नजर बाजीरावांवर पडली. तीचे नृत्य ते पापणी न हलवता पाहत होते. तिची नजर वारंवार पेशव्यांवर पडत असल्यामुळे नृत्यातील एकाग्रता भंग होत होती. बाजीरावांच्या मर्मभेदी नजरेनं ती विचलित झाली. तिने नृत्य संपवले.
मस्तानीने दोन्ही राजांना समोर येऊन मुजरा केला, तेव्हा बाजीराव भानावर आले. छत्रसालांनी तिला दागिन्यांची पेटी भेट केली. पण मस्तानीची नजर वारंवार बाजीरावांकडे जात होती. तिचे मन त्यांच्यावर जडले होते. पण तिला आपल्या स्थितीचीही कल्पना होती. सूर्याला धरायला जाण्यासारखे होते. पण मन होती की ते मानतच नव्हते. तिने मनोमन ईश्वराला आवळले आणि देवाने तिच्या प्रार्थनेचा स्वीकार केला….
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.


