संत मीराबाई चरीत्र भाग १, (१ ते ६)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


          ज्या राजस्थानांत प्राण,बलिदान देणारे वीर रजपूत होऊन गेले,जोहार करणार्‍या रजपूत रमणी निर्माण झाल्यात,त्याच शूरांच्या देशांत मीरा जन्माला आली.मीरामुळेच मेवाडदेश प्रसिध्द झाला.त्या शूर देशाच्या स्रीवर कृष्णभक्तीपायी कितितरी संकटे कोसळली तरी तीने अखेरपर्यत कृष्ण भक्ती सोडली नाही.मीरा स्वतःला क्षत्रिय वंशातील समजत असे.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! संत मीराबाई चरित्र !!!

भाग – १.

आतांपर्यंत बरेचसे संत चरित्र्ये लिहुन आपल्यासमोर प्रस्तुत केले व आपणही भरभरुन कौतुक करुन मला लिहिण्यास प्रोत्साहित केले.सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद!आपल्या क्रिया प्रतिक्रिया अपेक्षित!पुष्कळांनी मीराबाई बद्दल लिहिण्याचा आग्रह केला होता, त्यानुसार माझ्या अल्पबुध्दीनुसार लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.सांभाळुन घ्यावे.

ज्या राजस्थानांत प्राण,बलिदान देणारे वीर रजपूत होऊन गेले,जोहार करणार्‍या रजपूत रमणी निर्माण झाल्यात,त्याच शूरांच्या देशांत मीरा जन्माला आली.मीरामुळेच मेवाडदेश प्रसिध्द झाला.त्या शूर देशाच्या स्रीवर कृष्णभक्तीपायी कितितरी संकटे कोसळली तरी तीने अखेरपर्यत कृष्ण भक्ती सोडली नाही.मीरा स्वतःला क्षत्रिय वंशातील समजत असे.मीराची आई अतिशय धार्मिक!तिचा बराचसा वेळ पुजा अर्चा,भजन किर्तनात जाई,सद्गुरुं ची सेवा करी. अशाच भाविक वातावरणाचे संस्कार मीरावर होत होते.

जोधा नांवाच्या सरदाराने जोधपूर संस्थानची स्थापना केली.या रावजोधाला रावदूदा नांवाचा एक पुत्र होता.व या राव दूदाला चार पुत्र,त्यातील धाकटा रतनसिंह!रावदूदाने चारही पुत्रांना जहागिरी वाटुन दिल्या होत्या.अजमेरच्या मुसलमान सुभेदाराकडुन जिंकलेला बारा गांवचा मेडता परगाणा,जो जोधपुरपासुन ३५ मैलावर,तो रतनसिंहाच्या वाट्याला आला.मेडता परगण्यांतील कडकी गावात रतनसिंह राहत असे. त्याला मीरा नांवाची कन्या झाली.तीचा जन्म १४९५ ते १५०५ च्या दरम्यान झाला असावा.

मीराची आई भगवदभक्त असल्याने साधु संतांचा सतत राबता असे. “मीरा के प्रभु गिरिधर नागर” हे गीत भजन,किर्तन, उत्सव अनेक ठीकाणी ऐकता ऐकता आपण तल्लीन होऊन देहभान हरपल्या जाते.कृष्णभक्ती सागरांत डुंबत डुंबत मीराने अनेक कृष्णप्रेमाने ओथंबलेली गीते रचलीत.अनेक राग- रागिन्यात, सहज,सुरस राजस्थानी बोलीतील गीते अंतःकरणांत निनादत राहतात.

कृष्णभक्तीच्या पाण्यावर मीराच्या जीवनाची वेल वाढली,विस्तारली,बहरली त्या वेलीवर सुंदर सुंदर फुले,फळे आली. ती फुले आजही ताजी टवटवीत आहेत. त्यांचा सुगध इतक्या वर्षानंतरही दरवळत आहे.भाविकांची मने प्रसन्न, पुनीत प्रेरीत करण्याचे सामर्थ्य मीरेच्या गीतात आहे.

मीरा ४-५ वर्षाची असतांनाची गोष्ट..त्यांच्या घरी नेहमी साधुसंतांचा राबता असायचा!अशातच एक गोसावी मीराच्या घरासमोर मुक्कामाला होता. त्याचे स्नान झाल्यावर झोळीतील मूर्ती काढुन पुजा करीत असतांना मीरेला ती श्रीकृष्णाची मूर्ती दिसली मात्र,ती वेडावुन भान हरपुन एकटक त्या मूर्तीकडे बघत राहिली.मोहक,सावळी सुंदर,टपोर्‍या डोळ्याची,मोरपिसे,मुकुट,कुंडले,भाळा वर टीळा,गळ्यात वैजंयती माळा,ओठात मुरली,पायात घुंगरु,हे सलोने रुप पाहुन मीरा स्वतःला विसरुन गेली.मनांत आले हा नंदलाल असाच डोळ्यात साठवुन सदैव राहावा.ती एवढी तद्रुप झाली की, ती मूर्ती तिच्याकडे बघुन हसुं लागली. माथ्यावरची मोरपिसे हलतांना दिसली. मुरलीतुन स्वर्गीय सूर निघत आहेत,पायां तील घुंगरु ताल धरताहेत.मीराचा जीव तरंगु, झुलु लागला.ती एवढे भान हरपुन कितीतरी वेळ निश्चल उभी असलेली पाहुन,गोसाव्याने काय बघते विचारल्यावर,ती म्हणाली, बाबा!ही मूर्ती देता का?ही मूर्ती सोडुन दुसरं कांहीही माग!मीरा खिन्न झाली,डोळ्यांत अश्रू उभे राहिले.त्या भाबड्या पोरीला तसच दुःखी ठेवुन,मूर्ती झोळीत टाकुन जायला निघाला असतां,मीराचा दुःखी चेहरा पाहुन तिच्या आईनेही त्याला विनवले, वडिल रतनसिंहानेही सांगुन पाहिले पण गोसाव्याला कांही पाझर फुटला नाही. तो निघुन गेला.मीरा रात्रभर मासोळीगत तळमत राहिली, डोळ्यासमोरुन मूर्ती हलेना!रात्री उशीरा कधीतरी डोळा लागला.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!! संत मीराबाई !!!

भाग – २.

दुसर्‍या दिवशी सकाळी उशीरा झोपलेल्या मीराला गोसाव्याच्या आवाजाने जागी झाली. त्याने झोळीतुन सावळ्या कृष्णाची मूर्ती काढुन तिला देत म्हणाला, हा सावळा रात्री स्वप्नात येऊन मला मीराकडे पोहोचव म्हणाला. मीराने झपाटा मारुन ती मूर्ती घेतली व उराशी कवटाळली. भक्तांशी प्रेमळपणे वागणार्‍या गोपाळची मूर्ती ती कधीच दूर करणार नव्हती. कृष्णमूर्तीशी खेळण्यातच मीराचा सारा वेळ जाऊं लागला. कृष्णाशी बोलणे, रुसने, त्याला हवे नको विचारी. त्याच्या संगतीत अवघ्या जगाचा तीला विसर पडे. तिला त्या मूर्तीचे भारीच वेड लागले.

त्याकाळी लवकर लग्ने होत असत. तिच्या पांच वर्षाच्या मैत्रीणीच्या लग्नात रुबाबदार दुल्हा, फेटा बांधलेला, हाती तलवार, घोड्यावर बसलेला पाहुन, घरी आल्यावर आईला माझा दुल्हा कुठाय असे विचारल्यावर, मीराच्या हातातील गिरधारीच्या मूर्तीकडे बोट दाखवत म्हणाली, हाच तर तुझा नवरा! दुसरा कशाला हवा? मीराच्या बाल मनावर ही गोष्ट इतकी दृढ झाली की, हा गिरधारी गोपाळच आपला नवरा व आपण त्याची दासी! मीरा जसजशी मोठी होत गेली तशी ही भावना पक्की होत गेली. जो जन्मतो व नंतर मरतो असा नवरा करुच कशाला? दुसर्‍याशी कां विवाह करुं? ह्या जगांतील सौभाग्य एक दिवस नष्ट होणार म्हणुनच मी अविनाशी कृष्णाला वरले, ज्यामुळे मृत्युदेखील माझे सौभाग्य हिरावु शकणार नाही.

इतर लोक व्यसनाने धुंद होतात तर, मीरा हरिभक्तीच्या व्यसनांत रात्रंदिवस डुंबत पुजन चिंतन करीत करीत हरिमय होऊन गेली. ती थेट गिरिधररुपी सागराला जाऊन मिळाली. छोट्या मोठ्या तलाव, नाले, नदी यात ती रंगलीच नाही.

मीराचे वडिल रतनसिंह मोहिमा, लढायांत गुंतल्यामुळे त्यांना मीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता. आईच्या सावलीखाली लीन असलेल्या मीराला ती पांच वर्षाची असतांनाच तीला पोरकी करुन या जगाचा निरोप घेतला. मीराचे आजोबा रावदूदांनी मीराला मेडत्याला घेऊन गेले. ते धार्मिक व प्रेमळ वृत्तीचे, साधु संतांची सतत ये जा, पूजा-अर्चा, भजन किर्तन नेहमीच सुरु असत. आधीच तीच्या मनांत भक्तीचे बीज होते ते इथे अंकुरीत होऊन भक्तीच्या रोपाला खतपाणी मिळुन ते वाढु लागले. तीने संस्कृत, हिंदीमधे प्राविण्य, तसेच नर्तन, गाणे व इतरही शास्रांमधेही तीचे व्यक्ती मत्व वृधींगत होऊ लागले आणि तीचे दुर्देव आडवे आले. रावदूदाही तिला सोडुन गेले. हा दुसरा आघात !

अगदी लहानपणीच आपल्याला संसारांत सुख, शांती, कांही गम्य नाही ही जाणीव झाली. आजोबांच्या मृत्युनंतर काका वीरमदेव तिला मेडताला घेऊन आले, त्यांनी आई व आजोबांची उणीव भासू नाही दिली.

मीरा कृष्णाला आळवत, विणवत म्हणायची, प्रभु! ह्या संसारसागरांतुन तारुन ने. तू तर किती तरी भक्तांना तारले. सुदामा, ध्रुव, प्रल्हाद, शबरी, अहिल्या किती नांवे घेऊ ? त्यांना तारलेस, अरे ! मी या संसाराच्या सागरांत वाहत जात आहे, अरे रघुनाथा! तूच तर माझा खरा जिवलग! मला काठाशी नेऊन चरणी आसरा दे. मीरा अंतःकरणाच्या तारा छेडीत होती.

जरी मीराने कृष्णाला मनोमनी वरले असले तरी, व्यवहारी जगाला कसे पटणार? वीरमदेवाने वयात आलेल्या मीराचे लग्न मेवाडच्या महाराणासंग यांचा जेष्ठ पुत्र युवराज भोजराजाशी लावुन दिले. मीरा मेडतहुन सासरी मेवाडला आपल्या जिवलग गिरिधारची मूर्ती घेऊन आली. सासरीसुध्दा तिच्या कृष्णभक्तीत कुणी व्यत्यय आणला नाही. ४-५ वर्षे मीराचा संसार सुखाचा झाला.

ज्याला मनोमन लहानपणापासुन वरले, पती मानले, त्या सावळ्याची मूर्ती सतत तिच्या ह्रदयांत विराजमान होती. ती विसरुच शकत नव्हती. ती आपल्या पतीला उद्देशून म्हणते, राणाजी! मी सावळ्या कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडलेली असुन माझा पती माझ्या अंतःकरणांतच समावलेला आहे. त्या अनुभुतीचे वर्णन शब्दांतीत आहे.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!! संत मीराबाई !!!

भाग – ३.

भवितव्याच्या गर्भात दडलेल्या गोष्टी टाळतां येत नाही. सत्यवचनी राजा हरिश्चंद्राला डोंबाघरी पाणी भरावे लागले. पराक्रमी पांडवांना वनवास भोगावा लागला. इंद्राचे राज्यपद घेऊ पाहणार्‍या बळीस पाताळात जावे लागले. तद्वतच नियतीने मीराची कठोर परीक्षाच घेण्याचे ठरविले. तिच्यावर आघातामागुन आघात येत गेले. पण ती कृष्णभक्तीत एवढी मग्न होती की, या संसारीक आघाताला मनापर्यंत पोहचु दिले नाही किंवा लोकांना मनांतले दुःख कळु दिले नाही. पांचव्या वर्षी आई अंतरली. अजोबा रावदूदा सोडुन गेले. विवाहास पांच वर्षे लोटली नाही तोच पती भोजराजाचे निधन झाले. महाराजा संगाच्या वतीने बाबर विरुध्दच्या लढाईत वडिल रतनसिंह मारले गेले. आई, आजोबा, वडिल, सासरा एकामागुन एक सारी मायेची माणसे पोरकी करुन सोडुन गेली. एका गिरिधराशिवाय तिला कुणाचेच छत्र राहिले नाही.

मुळातच वैराग्याची प्रबळ भावना असलेल्या मीराचे संसारातुन लक्ष अजिबात उडुन गेले. संसाराचा समुद्र कोरडा पडल्यावर, आतां स्वतःसाठी किंवा इतरांसाठी जगण्याचे प्रयोजनच उरले नव्हते. गिरिधरच तिचे सर्वस्व होते. त्याच्या चिंतन, मनन, भक्तीत गुंगुन, रंगुन गेली. प्रिय माणसं सोडुन गेल्यावर साधु संताच्या संगतीत तीला सुख वाटुं लागले. त्यांच्या मुखातुन निघणारी कृष्णस्तुती ऐकुन स्वतःला धन्य मानु लागली. या संत सद्गुरुच्या उपदेशाने मनुष्य जन्मात काय करायला पाहिजे याचे महत्व तिला कळुन चुकले की, मनुष्यजन्म फार पुण्याईने मिळतो. जसे झाडावरुन गळुन पडलेले पान परत झाडाला लागत नाही, तद्वतच एकदा शरीरातुन गेलेला प्राण परत येत नाही. रामनामाशिवाय तरणोपाय नाही. मीराच्या मते संत रविदास (रैदास) यांच्या कृपेनेच आपल्याला ज्ञान प्राप्त झाले. पण बर्‍याच विद्वानांच्या मते संत रविदास (रैदास) मीराच्या खुप आधी होऊन गेले. त्यांची भेट घडलीच नाही. विद्वानांच्या मते संत रविदास (रैदास) यांच्या भक्तीमार्गातील त्यांच्याच नांवाचा दुसराच संत मीराला लाभला असावा. कदाचित त्यांच्पाकडुन मीराने दिक्षा घेतलीही नसेल, पण तीच्या पदांतुन त्यांच्याविषयीची भक्ती प्रगट झालेली दिसते. मीराचे सद्गुरु म्हणुन वल्लभ संप्रदायातील कुणी रामदास रुपगोस्वामींनी उपदेश दिला असेही म्हटले जाते.

प्रियजनांच्या मृत्युमुळे दुःखी मीराला हरिगुण गाण्यांतच शांती मिळु लागली. कृष्णभक्तीत धुंद होऊन गाऊ नाचु लागली. एका श्रीहरिखेरीज तीला दुसरे कांहीही सुचेना. संतसज्जनांच्या संगतीत आपले उदास जीणे विसरुन गेली. तिच्या कृष्णमंदिरांत दुरदुरुन साधु संत येऊ लागले. मेवाडमधील तिचे कृष्णमंदिर एक तिर्थस्थानच बनले. मृदुंग, टिपर्‍या, टाळांच्या आवाजाने कृष्णमंदिर निनादुन जाऊ लागले. श्रीहरीच्या मूर्ती समोर भाविकजन नामसंकिर्तनात दंग होत, मीरा पायात घुंगरु बांधुन, हाती एकतारी व चिपळ्या घेऊन देहभान विसरुन नाचत असे.” पद घुंगरु बांधकर! नाचूॅं नाॅंचू रे। नाॅंचू रे।” भोवतालच्या जगाची तीला शुध्द नसे, जणुं प्रभु गिरिधर ने तिला विकत घेतले व तोच तिला नाचायला, गायला लावत आहे.

तिच्यामते मूर्तीत असलेला कृष्ण जीवंत असुन तो तिच्याशी बोलत, संवाद साधतोय, अशा भक्तीची कल्पना सर्व साधारण माणसाला कोठुन असणार? सर्वसंगपरित्याग करुन ज्याला केवळ परमेश्वराचाच ध्यास जडला अश्या व्यक्ती विरळच!महाप्रभु चैतन्य सुध्दा असेच श्रीकृष्णाच्या चिंतनाने बेहोष होत असत. कृष्णाचे गुण गात नाचत असतांना कित्येकवेळा मीरा बेहोष होऊन पडत असे. पण लोकांना तीचे प्रभुसाठी तडफडणार्‍या ह्रदयाची कल्पना कशी येणार? मीराला वेडी ठरवुन मोकळे झाले.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!! संत मीराबाई !!!

भाग – ४.

कृष्णभक्तीने राणासंगाची सून वेडी झाली. क्षणांत हसते काय? रुसते काय? नाचते, गाते काय? कधी बेहोष होऊन निपचित पडते काय? ही खरोखरच वेडी झाली. कृष्णप्रेमाचे वेड लागले मीराला! मेवाडच्या राजघराण्यांतील स्रीचे नखही दिसणे दुरापास्त, अशी ही मीरा सामान्य माणसांत वावरु, बोलु, गाऊ लागली. त्यांच्या समोर नाचु लागली असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. महाराणा संगाच्या (सासरे) मृत्युनंतर सर्व जनलज्जा सोडुन ठीकठीकाणच्या मंदिरात मीरा जाऊं लागली. आपण राणासारख्या प्रतिष्ठीत राजघराण्यांतील सून आहोत याचेही तिला भान नव्हते. राणा घराण्याची प्रतिष्ठाही तीला अडवु शकली नाही. मीराच्या अश्या बेबंद वागण्याने राजघराण्यांतील लोकांना आपली प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहे असे वाटुन तिला नाना प्रकारे परावृत्त करण्याचा प्रयत्न करुं लागले. मीरा ! असे चवचाल वागणे सोड. भक्तीच करायची तर राजवाड्यांतील मंदिरात कर! इतरांसमोर, दहा गांवच्या लोकांना जमवुन त्यांच्या समोर कशाला? तुझ्या अश्या वागण्याने कुळाची अब्रु जाते, कुळाला बट्टा लागत आहे.

दीर, सासु, ननंद सारी मीराला कुळबुडवी, कुलटा, निर्लज्ज, वेडी म्हणत तीला दुषणे देऊ लागली. पण भक्तीरसात आकंठ बुडलेल्या मीरावर या शिव्याशापांचा कशाचाच परिणाम होत नसे. तिच्या मनापर्यंत जातच नसे. ती केवळ कृष्ण कृपेसाठीच तळमळत होती. त्याच्याखेरीज तिला दुसरे कांहीच दिसत नव्हते. मीरा आपल्या वेदना वियोगात इतकी व्याकुळतेने म्हणते की, मला जर आधी माहित असते की, प्रेम करतांना एवढ्या दुःखाचा सामना करावा लागतो तर सर्वांना प्रेम करुं नका म्हणुन सांगीतले असते. मीराच्या माहेरचे लोकं नेहमी मेवाडच्या राणांसोबत युध्दात भाग घेत असत. मीराच्या वडीलांनी राणांतर्फे लढतां लढतां आपल्या प्राणांची आहुती दिली होती. पण तीचे काका राव वीरमदेव मीराला सासरकडुन होत असलेल्या त्रासाने दुःखी असल्यामुळे यावेळी राणाच्या मदतीला गेले नाही. चितौडमधे मीरा वर होत असलेला जुलुम होत आहे हे माहित असुनही राव वीरमदेव विवश होते परंतु चितौडवर बहादूरशहाच्या आक्रमण होण्याआधीच मीरा चितौड सोडुन माहेरी मेडताला आली. मेडतातही तीच्या नशीबी सुख नव्हतेच! चितौड काय नी मेडता पुर्ण राजस्थानच रुढी परंपरांनी व्याप्त होता. रितीरिवाज, कर्मकांडाच्या विरोधात मीराचे वागणे तेव्हाच्या समाजाला रुचण्यासारखे नव्हते. तीचे म्हणणे जर, कंदमुळे, फळं खाऊन जर परमेश्वर प्राप्ती होऊ शकते तर वानरच कां होऊ नये? जर दगडाची पुजा करुन इश्वरप्राप्ती होऊं शकते तर मी पहाडाची पुजा करण्यास तयार आहे. खर्‍या प्रेमाशिवाय इश्वरप्राप्ती शक्य नाही. तिच्या अश्या प्रकारच्या वक्तव्याने त्यावेळच्या धार्मिक मान्यतांची नीवच हलवली. याचा परिणाम तीला निंदा, आलोचनाचा सामना चितौडला तर करावाच लागला पण मेडताही सुटले नाही.

संपुर्ण परिवारात मीरा एकटीच कन्या असल्यामुळे राव वीरमदेव व पत्नी तीला खुप प्रेमाने वागवत! परंतु वीरमदेव एक न्यायप्रिय शासक तसेच सामाजिक, धार्मिक रुढीही ते मानत होते. ते मीराच्या मार्गात अडचण बनु इच्छित नव्हते, पण सामंत आणि मुख्य लोकांना अप्रसन्नही करुं शकत नव्हते.

मीरा, आपल्या काकांची घालमेल, परेशानी बघुन चुपचाप कोणालाही न कळवतां एक दिवस चितौड तर आधीच सुटले होतेच,आतां मेडतां पण सोडुन कांही इतिहासकारांच्या मते वृंदावनला गेली. त्यावेळी जीव गोस्वामी स्वामींचा बराच प्रभाव असल्यामुळे व श्रीकृष्णाचे उपासक असल्याची किर्ती तीच्या कानावर आल्याने ती त्यांना भेटण्यास उत्सुक झाली, पण ते स्रीयांचे मुखावलोकनपण करीत नसल्यामुळे त्यांनी स्पष्ट नकार दिल्यावर ती त्यांना निरोप पाठवते….

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!! संत मीराबाई !!!

भाग – ५.

वास्तविक प्रसिध्द जीव गोस्वामी पेक्षा मीरा कितीतरी छोटी असली तरी, भक्तीमधे ती परिपक्व झालेली होती. तीने त्यांना मर्मभेदी निरोप पाठवल्यावर जिवनांत पहिल्यांदा, तोही एका स्रीकडुन आत्मविश्वासपुर्ण आलेल्या संदेशाने त्यांच्यातला भ्रमाचा पडदा दूर झाल्याने त्यांनी आदरपुर्वक सन्मानाने तीची भेट घेतली. त्यानंतर मीरा वृंदावनमधेही जास्त थांबली नाही, कारण भारतातील सर्वच तिर्थांमधे खोखले रुढीवादी प्रचलन तिच्या सारख्या भक्त वत्सलला कसे सहन होऊ शकेल? वृंदावनहुन मीरा गुजरात कडे निघाली. कदाचित ती गुरु रविदासांना भेटण्यास गेली असावी. मेडता सोडतेवेळी ती ३६ किंवा ३८ वर्षाची इतक्या कमी वयाची असली तरी तिची भक्ती आंतरिक अनुभुती व आत्मज्ञानाने पुर्णतहा विकसीत झालेली होती. मीराने बराचसा कालावधी शांततापुर्वक गुजरातमधे घालवला. तीने केलेल्या गुजराती भाषेत अनेक पदांच्या रचना प्रसिध्द आहेत.

चितौडच्या पतनानंतर कांही सामंतांनी क्षतविक्षत झालेल्या राजगादीवर राणा विक्रमला बसविले. परंतु एका वर्षातच त्याच्या चुलत भाऊ बनवीरने त्याचा खुन करवुन १५३७ मधे जो राणा संगाचा मोठा भाऊ पृथ्वीराजचा अवैध्य पुत्र बनबीरने स्वतःला राणा घोषित केले. १५४० मधे राणा संगाचा सर्वात लहान पुत्र, मीराचा लहान दीर उदयसिंहने कांही मुख्य कारभारी व सामतच्या मदतीने बनबीरला मारुन स्वतः राणा बनला.

एकेकाळी असलेलं शक्तीशाली चितौडची राजधानी आज एक साधारण सुभासारखी परिस्थिती बनली. त्यावेळी वीरपुरुष व स्रीयांची पुर्ण पिढी युध्दात कामी आली होती. या युध्दाचा परिणाम साधारण जनता भोगत होती. अशाही परिस्थीतित मेवाडवासी मीराला विसरले नव्हते. तिचे काव्यगायन मोठ्या भक्ती भावाने गात होते. त्यांना वाटत होते की, मीरावर केलेल्या अत्याचारामुळेच असे वाईट दिवस आलेत. राणा रतनसिंह लढाईत मारल्या गेल्यावर, ज्या राणा विक्रमने मीराचे प्राण घ्यायचा प्रयत्न केला, त्याची हत्या झाली. चितौडमधील ज्या ज्या लोकांनी निंदा नालस्ती केली, सतावले ते सर्वच जवळ जवळ बर्बाद झाले. मीराच्या कष्टपुर्ण व संघर्षमय गेलेल्या तीच्या जीवनाच्या आठवणींने लोकांचा कल, सहानुभुती मीराकडे वळली. सर्वांना वाटु लागले की, तिच्यावर झालेल्या अन्यायाचे प्रायश्चित घेण्यासाठी म्हणुन स्वतः राणा व नागरिकांनी तीची माफी मागुन परत आणावे.

राणा उदयसिंहाने सर्वांच्या भावनेचा आदर करुन कांही ब्राम्हणांना मीराला आणायला द्वारकेस पाठवले. परंतु, मीरा आतां स्वतःलाना राजघराण्याची सून मानत होती ना चितौडला आपले घर! सर्व बंधने तोडुन मेवाडच्या राजघराण्याचा संबंध तीने तोडला होता. त्या राजमहालरुपी सोन्याच्या पिंजर्‍यांंत अडकण्याची तीची इच्छा नव्हती ती तीच्या य्रियतम भगवंताच्या चरणी लीन झाली होती.

तीला परत चितौडला चलण्यासाठी ब्राम्हणांनी केलेली प्रार्थना, अनुनय, हट्ट सारे प्रयत्न व्यर्थ गेल्यावर, राणाच्या भीतीने, मीरा जर चितौडला येण्यास तयार नसेल तर, आम्ही अन्न जलाचा त्याग करु.

मीरा मोठी दुविधेत पडली, तीला कांही झाले तरी चितौडला जायचे नव्हते पण या ब्राम्हणांचे अन्न पाण्याशिवाय उपाशी मरणेही पसंत नव्हते. अशातच ३-४ दिवस गेले. त्यांची वाईट झालेली हालत पाहुन अखेर त्यांच्यासोबत यायचे कबुल केले. त्यादिवशी सायंकाळची प्रार्थना करायला द्वारकाधीश मंदिरांत गेली. दुसर्‍या दिवशी पहाटे जेव्हा पुजार्‍यांनी मंदिर उघडले तेव्हा त्यांना कृष्णमूर्तीच्या हाती फक्त मीराची ओढणी दिसली. तिथल्या विद्वान पंडीतांच्या मते मीरा कृष्णमूर्तीत सामावल्या गेली.

हरिचा नाद सोडावा म्हणुन तिच्या भोवतालच्या माणसांनी नाना प्रयत्न, अन्याय केला पण तिने सर्व सहन करीत, लोकरीत झुगारुन, कुळाची मर्यादा ओलांडली, पण एका गिरिधराखेरीज दुसरा कोणताही विचार तिच्या मनास भावेना. तीचे म्हणणे श्रीहरी माझ्या प्राणांचा आधार! सगळा संसार, जग पाहिला, पण श्रीहरिखेरीज दुसरे काहीच मनास आवडले नाही. सगळे विसरुन मी फक्त आणि फक्त श्रीहरीचीच दासी ! इतर सारे मला व्यर्थ! मीरा रजपूत स्री असल्यामुळे, मुळातच बाणेदार व निर्धारी वृत्ती असल्यामुळे भक्ती मार्गावर कुणाच्या निंदेला, रागाला, अन्यायाला निर्धाराने अढळपणे, निर्भिडपणे तोंड देत पुढे जातच राहिली.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!! संत मीराबाई !!!

भाग – ६.

आतां मीराचे गिरिधराशी असलेले नाते, वागणे जगजाहीर झाले होते. लपुन कांहीच नव्हते. वडाचे इवलेसे बी रुजुन विस्तारुन प्रचंड वृक्ष होतो तसेच मीराच्या बाबतीत झाले होते. पाण्यात उतरण्यापुर्वी विचार करायचा असतो, आतां तर मीरा ऐन धारेत होती. मागे वळुन पाहण्याचा प्रश्नच नव्हता. मान अपमान दोन्हीही तिच्या लेखी सारखेच !

मीराच्या गाण्यानाचण्याला पायबंद घालण्याचा, विघ्ने आणण्याचा राणा विक्रमजीतसिंह, धाकटा दीराने खुप प्रयत्न केला. मिळेल त्या मार्गाने छळले, पण मीराचा श्रीहरीवर दृढ विश्वास होता. जेव्हा तिचा छळ होई तेव्हा ती श्रीकृष्णाची अत्यंत कळकळीने मनोभावे प्रार्थना करी. हे प्रभु! तू द्रौपदीला वस्रे पुरवुन तीची लाज राखलीस, प्रल्हादासाठी नरसिंह अवतार घेतलास, तेव्हा मलाही तूं नक्कीच तारशील!

राजघराण्यांतील मीराच्या वागण्यांत कांहीच फरक पडत नसल्यामुळे लोकं नांवे ठेवु लागल्यामुळे राणा विक्रमजीत सिंहाला शरमेने मान खाली घालावी लागे कांही दुष्ट सलाहाकारांनी सल्ला दिला की, मीरा धमकीने, उपदेशाने वठणीवर येत नाही. हा घराण्याला लागलेला कलंक नष्ट केला पाहिजे! झाले! दुष्टचक्र सुरु झाले. मीराला नाहीसे कसे करावे ही कपट कारस्थाने रचली जाऊं लागली.

तिला मारण्यासाठी अनकुचीदार व टोकदार खिळ्यांची सेज करण्यांत आली. व्यवस्थित चादरीने झाकुन ती सेज विक्रमजीतसिंहने मोठ्या प्रेमाने मीराकडे पाठवुन दिली. भक्तीत तल्लीन, रंगलेल्या मीराला याची काय कल्पना असणार? दीराने प्रेमाने पाठवलेल्या सेजवर श्रीहरीच्या नामस्मरणात दंग असलेली मीरा त्या काटेरी सेजवर पहुडली. कुटील लोकांना तिच्या किंकाळण्याचा, विव्हळण्याच्या आवाजाची प्रतिक्षा होती, ती सेजेवर झोपल्याबरोबर टोकदार खिळे अंगात घुसुन विव्हळेल, ओरडेल व मरण पावेल, पण झाले वेगळेच! त्या सुळांच्या सेजेवर पहुडलेली मीरा कृष्णभक्ती गीत गात गात सुखाने झोपी गेली.

आणि काय आश्चर्य! मीरासाठी धाडलेल्या सुळ्यांच्या सेजेला मीराची पाठ लागताच, त्या सुळांची, खिळ्यांची फुले झाली. विक्रमजीतसिंहाला ही बातमी कळल्यावर खोट्या अहंकारापायी कुळाच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी मीराचे खरे सामर्थ्य त्या माठाला न कळतां तिला मारण्याचा त्याने दुसरा प्रयोग केला. एका सुंदर पेटार्‍यात भयंकर विषारी साप घालुन नोकराकरवी मीराच्या महलात पाठवुन दिला. मीरा श्रीकृष्णाच्या पुजेच्या तयारीत होती, पाठवलेला पेटारा पाहुन हे काय असे विचारल्यावर, सुदर ताज्या फुलांचा हार! भाबड्या मीराला वाटले, राणाचे ह्रदय परिवर्तन होऊन, आपल्या गिरिधरासाठी हार पाठवण्याचे पाहुन अतिशय आनंद झाला. ती मुरली गोविंदाचे गीत गात गात पेटारा उघडु लागली. व विक्रमजीत सिंहाची उलट्या काळजाची कुटील माणस मीराला साप दंश करेल, ती काळी निळी होईल, किंकाळी मारुन मरुन पडेल अशा कल्पना करत चोरुन पाहु लागली आणि मीराने पेटारा उघडुन हात घातला तर पेटार्‍यातुन ताज्या सुगंधी डेरे दार फुलांचा हार! किती प्रभुची अगाध लीला! खिळ्या, सुळ्यांचे फुले, सर्पाची फुलमाळ करतो. त्यासाठी फक्त त्याच्या भक्तीरसात पुर्णतः डुंबुन जावे लागले.

एवढे मोठे दोन चमत्कार घडल्यावरही विक्रमजीतसिंहाचे डोळे उघडले नाही. घरांतुन भक्तीगंगा वाहत होती आणि हा मात्र कोरडाच राहिला. मीरा नक्कीच चेटकीन, जादुगीरीन आहे. त्याशिवाय असे चमत्कार शक्यच नाही. परत कुटाळक्यांनी त्याचे कान भरणे सुरु केले आतां तिला नष्ट करण्यासाठी जालिम विष पाजुनच कार्य साधावे लागेल.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!! संत मीराबाई !!!

*जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे

संत तुकाराम म. चरित्र संपूर्ण भाग

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading