👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ६०
त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासी भजें ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥
अर्थ:-
त्रिगुणातील हा संसार असार आहे तो निर्गुण परमात्मा हाच साररुप आहे. विचार व विवेक हाच हरिनामाने प्राप्त होतो. सगुण निर्गुण ह्यात न अडकता त्या आत्मारामाला कोणतेच गुण अडकवु शकत नाहीत.त्यामुळे हरिनामाशिवाय असलेले मन व्यर्थ आहे. तो व्यक्त आहे की अव्यक्त आहे हे माहित नाही त्याला एका आकारात पाहता येत नाही. तो सर्व चराचरात व्यापला असला तरी ते चराचरा त्याचे नाम जपत आहे. सतत रामकृष्ण मनात व ध्यानात असणाऱ्याला जन्मोजन्मीचा पुण्यलाभ ह्याच जन्मात होतो असे माऊली सांगतात.
