दृष्टांत 110 कर्मसिद्धांत देवदूत तिसर्‍यांदा व शेवटचं हसला

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

कर्मसिद्धांत……..*

एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं.एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं..तो तिथे पोचला पण…थोडा संभ्रमात पडला.त्या स्त्रीची तीन लहान जुळी ( खरंतर तिळी म्हणतात त्यांना) बाळं रडत होती..त्यांचे बाबा तर खूप आधीच देवाघरी गेले होते आणि आता आईविना ती अनाथ होणार होती.हे सर्व बघून देवदूताला दया आली तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने यमदेवाकडे आला व सर्व परिस्थिती सांगितली,

ती ऐकून यमराज भडकले, तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का?? प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा निसर्गनियमांमधे हस्तक्षेप करत नाही मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास?त्या स्त्रीचा मृत्यू तर अटळ आहे मी दुसर्‍या दूताकरवी ते काम करीनच पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल व जोपर्यंत तू स्वतः तीनवेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच हसणार नाहीस तो पर्यंत तुझी सुटका होणार नाही…तू इथे परत येऊ शकणार नाहीस.(इथे मला एक महत्वाची गोष्ट सांगाविशी वाटते की, दुसर्‍याच्या चुका व मूर्खपणावर तर अहंकारी माणूस हसतो पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढं धैर्य लागतं.. ) दूत शिक्षा भोगण्यास तयार होता..

यमलोकातून त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हाकललं गेलं.त्याच सुमारास समोरुन एक चर्मकार येत होता.थंडीचे दिवस (व तीसुद्धा रशियातली थंडी) येऊ घातले होते म्हणून आपल्या बायको व मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेटस् खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता.त्याने या वस्त्रहीन देवदूताला बघितलं त्याला दया आली व त्याने घरातील लोकांऐवजी ह्या माणसासाठीच कपडे ,ब्लँकेट वगैरे खरेदी केलं व नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटलं देवजाणे तो दूताला म्हणाला, “अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय जगणार आहेस?” माझ्या घरी चल काही दिवस…! माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल पण तू मनाला लावून घेऊ नकोस..काही दिवसांनी सगळं ठीक होईल.त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी आला ( आता मजा बघा हं! त्या चर्मकारालाही माहीत नव्हतं, आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेत आहोत ना त्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रुपात कोण आलाय ! ) त्याची ओळख करुन देत चर्मकाराने सांगितलं हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे. घरी आलेल्या आगंतुकाला बघून पत्नीचं टाळकंच सरकलं, त्याच्या समोरच म्हणाली, “इथं आपल्याला गिळायला अन्न नाहीय त्यात भरीस भर म्हणून ही ब्याद का मागे लावून घेतलीय?”


….आणि देवदूत पहिल्यांदा हसला.. चांभाराला आश्चर्य वाटलं ती तुला एवढं बोलली आणि तू त्यावर हसत आहेस?? त्यावर देवदूत म्हणाला अशाप्रकारच्या अजून दोन घटना झाल्यावर व त्यावर मी हसल्यानंतर ह्याचं उत्तर देईन..! आजच्या घटनेवर दूत हसला कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पतिराजांनी ज्याला घरी आणलं आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्यामधे दैवी शक्ती आहे..ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसांतच त्यांचं भाग्य उजळणार आहे…मनुष्याचे विचार किती सीमित व स्वार्थी असतात ना? (हम उतना ही देख लेते हैं जितना हमें ऊपरी तौर पर दिखता हैं नियती के मन में तो कुछ और ही होता हैं ) पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचं दुःख होतं.. जो खो गया उसे देख रही थी जो मिला हैं उसका क्या??उसका तो अंदाज ही नहीं है-मुफ्त ! घर में एक देवदूत आया है।
….
सात दिवसांतच देवदूत चांभाराचं सर्व कसब शिकला…व देवदूताने बनविलेले चामड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले,की जो-तो त्यांची स्तुती करु लागला. देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार धनवान होऊ लागला.अवघ्या सहा महिन्यांत तर त्याची अशी ख्याती पसरली की ह्या चांभारासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही.अन्य देशांतील राजांचेही जोड बनविण्याचे काम चांभाराकडे येऊ लागले व घरामधे अपार संपत्ती येऊ लागली.
दिवस-महीने-वर्ष पुढे सरकत होती..
एकदा असं झालं.. सम्राटाचा एक अधिकारी आला..चांभाराकडे कातडं सोपवलं व म्हणाला हे खूप दुर्मीळ व महागडं कातडं आहे..तुझी कारीगरी सम्राटांना पसंत आहे म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातडं आपले बूट बनवण्यासाठी दिलं आहे. चूक झाली झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत.लक्षात ठेव सम्राटाच्या पायाकरीता बूट बनवायचे आहेत स्लीपर नाही..! अधिकार्‍याने स्पष्टपणे खडसावले..! (रशियामधे मृत व्यक्तीला स्लीपर घालून स्मशानांत नेण्याची प्रथा होती)
चांभारानेसुद्धा देवदूताला बजावलं हे बघ, सम्राटांच्या पायाकरीता या दुर्मीळ कातड्याचे बूट बनवायचे आहेत स्लीपर नव्हे व कातडं सुद्धा बूटाच्या मापापुरतेच आहे..काही गडबड झाली तर नसती आफत ओढवेल…
एवढं निक्षून सागूनही देवदूताने स्लीपरच बनवल्या.. चांभाराने त्या बघितल्यावर तो इतका क्रोधीत झाला व देवदूताला काठीने झोडपून काढले.. तू मला फासावर लटकवणार आहेस का? इतके वेळा बजावले तरी तू स्लीपर का बनवल्यास?


देवदूत जोरजोरात हसू लागला…! तेवढ्यात सम्राटाचा अधिकारी आला व म्हणाला बूट नको स्लीपर बनव….
आपल्या सम्राटांना कालच देवाज्ञा झाली आहे उद्या त्यांचा अंत्यविधी आहे…
( भविष्य अज्ञात असतं व आपण गतकाळातील अनुभवांवर जगत असतो.काल सम्राट असताना बूटासाठी आटापिटा होता…. आज स्लीपर हवी आहे )
..चांभाराने लगेच त्या स्लीपर दिल्या … अधिकारी निघून गेल्यावर चांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला.. मी तुला उगाच मारले…देवदूताने शांतपणे सांगितलं अरे, ह्यात तुझा काहीही दोष नाहीय मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय. आज दुसर्‍यांदा देवदूत हसला कारण भविष्य अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटलो आहोत. साध्या घटनांमधेसुद्धा चिडचिड, त्रागा करत बसतो.मृत्यूघटीका समीप असताना जीवनाचे गणित बांधत रहातो व नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं..


देवदूताला जाणवू लागलं त्या तीन अनाथ मुलींचं भवितव्य काय? हा अनाठायी विचार मी करत होतो…!
काही दिवसांतच तिसरी घटना घडली….या चांभाराकडे
एका धनाढ्य घराण्यातील वृद्ध स्त्री आली व बरोबर तीन सुंदर युवती आल्या..तीनही युवतींचे लग्न ठरलं होतं त्यांच्यासाठी उत्तम चढावांचे जोड बनवून हवे होते.देवदूताने तीन मुलींना पाहताक्षणीच ओळखलं ह्याच त्या तीन मुली होत्या ज्यांच्या मृतप्राय आईकडे बघून त्याला दया आली व नियतीमधे स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता.त्या तिघीजणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या.

देवदूताला उत्सुकता वाटली त्यांच्या बरोबर जी वृद्धा अाली आहे ती कोण आहे? वृद्ध स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली.ह्या मुली माझ्या समोरच रहात होत्या.ह्यांची आई लहानपणीच देवाघरी गेली.ती अतिशय दारिद्यात दिवस कंठत होती. तिच्या पश्चात् ह्या मुलींचं कसं होणार? मला दया आली व ह्या तिघींना मी दत्तक घेतलं, मलाही संतान नव्हती. मी स्वतःच्या मुलींप्रमाणे ह्यांचं पालनपोषण केलं व आता सम्राटाच्या राजपुत्रांशी ह्या तिघीजणी विवाहबद्ध होणार आहेत…हे ऐकल्यावर…..
देवदूत तिसर्‍यांदा व शेवटचं हसला ….त्याने चांभाराला स्वतःच्या हसण्याचं कारण सांगायला सुरुवात केली…..

आज जर त्या
तीन मुलींची आई जिवंत असती तर ह्या तिघीजणी दारिद्यात खितपत पडल्या असत्या..पण आता आई नसल्याने वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीला वारस मिळाला व तिघीजणींनी समृद्धी उपभोगली..तसेच वृद्ध स्त्रीला संतानसुख मिळालं…!
देवदूताने सांगितलं मी चुकलो होतो.. नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबद्ध व योग्य आहे.तिच्या कार्यामधे मी हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली…आता मी तुझा निरोप घेतो…….!

एवढं बोलून तो
देवदूत पाहता-पाहता तिथून अदृश्य झाला…!

कथा जरी इथे संपली असली तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्याबरोबर ठेवायचा आहे…!

एकंदरीत सध्याचं वातावरण व काहींचे अपमृत्यू / देहहत्या बघून बर्‍याचजणांच्या मनांत हा प्रश्न येतो, इतक्या तरुण वयांत ही व्यक्ती का गेली?त्याच्या पश्चात् त्याच्या कुटुंबांचं /मुलाबाळांचं काय होणार?
काहीजणं तर ह्या घटनांकरता चक्क परमेश्वरालाच दोषी ठरवतात…म्हणे, त्याला जर न्यायचंच होतं तर हाॅस्पीटलचा खर्च व इतक्या यातना का दिल्या?ज्या ईश्वराचं वर्णन आपण प्रेमाचा सागर, कृपाळू असं करतो तो आपल्याच मुलांशी असा निष्ठूरपणे कशाला वागेल? मनाला येईल तसं स्वतः वागायचं,वाट्टेल तशा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र प्रेमळ परमेश्वराला अशी दूषणं द्यायची हा करंटेपणा कशासाठी??
वरील सर्वांचं एकमेव उत्तर म्हणजे
कर्मसिद्धांत…!!!
परमेश्वर कर्मामधे कधीही ढवळाढवळ करत नाही पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त
होण्याचा मार्ग मात्र सुचवितो…
……आणि म्हणून तो म्हणतो….
न धरी, शस्त्र करी मी, परि सांगीन गोष्टी युक्तीच्या चार..!

धन्यवाद..

१५० दृष्टांत संग्रह पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading