उत्पत्ती एकादशी

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


एकादशी, सण आणि उत्सव
एकादशी एक देवीचे स्वरुप मानले गेले असून, कार्तिक वद्य पक्षातील एकादशीला ती प्रकट झाली होती, असे मानले जाते. यामुळे कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशी उत्पत्ती एकादशी म्हणून संबोधली जाते.
कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील उत्पत्ती एकादशीचे महत्त्व, मान्यता, पूजाविधी व व्रतकथा जाणून घेऊया.
हे पण वाचा:- एकादशी का करतात?

उत्पत्ती एकादशीचे महत्त्व
उत्पत्ती एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते, या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते. अश्वमेध यज्ञ, कठोर तप, तीर्थस्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या फळाहून अधिक पुण्य या व्रताने मिळते, अशी मान्यता आहे. एकादशी ही एक देवी असून, तिचा अवतार भगवान श्रीविष्णूंमुळे झाला होता. एकादशी देवी कार्तिक वद्य एकादशी दिवशी प्रकट झाली होती. यामुळे कार्तिक वद्य एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले. या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरु झाले, असे सांगितले जाते


उत्पत्ती एकादशी कथा –
श्रीकृष्णाने युधिष्ठिराला उत्पत्ती एकादशीची कथा सांगितली होती, असे म्हटले जाते. सतयुगात मुर नामक राक्षस होता. त्याला स्वतःच्या शक्तीवर खूप गर्व होता. त्याने स्वर्गावर आक्रमण करून देवराज इंद्राला पराभूत केले. सर्व देव भयभीत होऊन श्रीविष्णूंकडे आले. श्रीविष्णूंचरणी नतमस्तक होऊन यावर मार्ग काढण्याची विनंती केली. तेव्हा विष्णू स्वतः त्या दैत्याशी युद्ध करण्यास सज्ज झाले. हे युद्ध अनेक वर्षे चालले. युद्ध करून श्रीविष्णू थकले आणि बद्रिकाश्रम नामक गुहेत जाऊन आराम करू लागले. राक्षस विष्णूंच्या मागे गुहेत गेला.


श्रीविष्णू ध्यानस्थ असताना त्यांच्यावर प्रहार करण्याचा राक्षसाचा मानस होता. तेवढ्यात एक देवी प्रकटली आणि तिने राक्षसाचा वध केला. राक्षसाचा वध केल्यामुळे श्रीविष्णू देवीवर प्रसन्न झाले. एकादशी तिथीला आपण प्रकट झाल्यामुळे आपण यापुढे एकादशी नावाने ओळखल्या जाल. या दिवशी व्रत करणे सर्वाधिक महत्त्वाचे ठरेल. एकादशीचे व्रत करणाऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण होईल, असे वरदान श्रीविष्णूंनी दिले. तेव्हापासून एकादशी व्रताचरणास प्रारंभ झाला, अशी मान्यता आहे.

उत्पत्ती एकादशी पूजा विधी –
उत्पत्ती एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.

उत्पत्ती एकादशी व्रतसांगता –
उत्पत्ती एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये, असे म्हटले जाते. तसेच व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची

मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading