रामायणातले संस्कृती दर्शन भाग ६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग 6


मंगल स्नान माहात्म्य
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन रामायणातले संस्कृतीदर्शन पाहुया.
रामचंद्रांच्या राज्यारोहणाचा विषय सुरु आहे मागील भागात आपण ध्वज तोरणांचा उल्लेख पाहिला आज पुढिल भाग पाहु
मंथरा नामक एक दासी जी कैकयीच्या माहेरुन आली होती तीने राजवाड्याच्या गच्चीवरुन पाहिले
सिक्तराजपथां कृत्स्नां प्रकीर्णकमलोत्पलाम ।
अयोध्यां मन्थरा तस्मात् प्रसादादन्ववैक्षत ।।2 ।।
मंथरा नामक दासीने पाहिले अयोध्येच्या रस्त्यांवर सडासंमार्जन सुरु होते.सर्व राज्यात जिथे तिथे कमल व उत्पल म्हणजे नीलकमल फुलली होती.
कमळे हि एकारात्रीत किंवा दिवसात फुलत नाहित तर त्यांचाकरता विशेष हौद व्यवस्था करावी लागते त्यांची निगा ठेवावी लागते.म्हणजे अयोध्येत रस्त्यांवर फुलझाडे पुष्पवाटिका रस्त्यांच्या सुशोभीकरणाकरता आधीपासुन होत्याच.आजहि आपण शहरांमध्ये हमरत्यांवर सर्कल किंवा ट्रँगल ला फुलांचे बगीचे पाहतो.काहि ठिकाणी दोन रस्त्यांच्यामधेहि फुलझाडे किंवा बगीचे केलेले असतात.हि संस्कृती आजहि टिकुन आहे..
सिक्तां चन्दनतोयैश्च शिर:स्नातजनैर्युताम् ।। 3 ।।
राजमार्गांवर चंदनमिश्रीत जल शिंपडण्यात आले तसच अयोध्येतले सर्व लोक उटणे लावुन शिर:स्नान करुन तयार झाले होते.
आपल्या कडे गावात आजहि घरासमोरील रस्ता व अंगण हे देखील रोज पाण्याने धुतात किंवा शेणसडा संमार्जन करतात रामायणकाऴापासुन किंवा त्याआधीपासुन सडासंमार्जन संस्कृती आपल्याकडे सुरु आहे .


सर्वजनांनी उटणे (चंदनतोयाने) लावुन डोक्यावरुन मंगल स्नान केले (शिर:स्नान) होते.आपल्याकडे मंगलकार्याच्या वेऴी किंवा सणावाराला माताभगिनी शिर:स्नान करतात तसच दिपावली गुढिपाडवा वगैरे दिवशी उटणे लावुन स्नान करण्यात येते.प्रत्येक व्रताचा आरंभ करतानाहि मंगलस्नान आवश्यक आहे.
मंगलस्नानाकरता जल कसे हवे तेहि ओघात पाहुया
न वर्णगन्धरस दुष्टाभिर्याश्च स्युरशुभागमा:।। (वासिष्ठस्मृति 3 अध्याय)
ज्या पाण्याचे रुप रस गंध हे बिघडले असेल व जे अपवित्र मार्गाने वाहुन अाल असेल ते पाणी आचमन (पिण्याकरता) व स्नानाकरता वापरु नये.
पंचेन्द्रियस्य देहस्य बुध्देश्च मनसस्तथा।
(शांडिल्यस्मृति)
पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियांसोबत देह, बुध्दि व मन हे शुध्द होणे हे आवश्यक आहे.
एखादा म्हणेल का आवश्यक आहे? तर त्याला नम्रपणे सांगा हा देह नवद्वारांचा नरक आहे.
दोन डोऴे
दोन कान
दोन नाकपुड्या
मुख
गुदमार्ग
उपस्थ (जननेंद्रिय)
या नउ छिद्रांमधुन सदैव सकाऴी शरीरातला मल बाहेर पडत असतो मग यांची शुध्दि करणे हे आरोग्यशास्त्राच्या दृष्टिने आवश्यक नाहि का?
एखादा नास्तिक पटकन शंका विचारेल तीर्थावर स्नान करुन तुम्हि पाणी दुषीत करता? हे कसले शास्त्र?
त्यांना उत्तर द्या कि शास्त्रकारांनी नदी सरोवर वगैरे ठिकाणी स्नान करताना काहि बंधने घातली आहेत ती पाऴलीच पाहिजेत त्यात सर्व समावेशक विचार झालाय


अम्बु न क्षोभयेदङ्गै: पादेनोत्सादयेन्न च ।
नाचरेत् प्लवनं क्रीडां न गण्डुषं जलं क्षिपेत् ।
अन्योऽन्यं न क्षिपेत् तोयं न देह मलमुत्सृजेत् ।
न कुत्सयेदम्बुतीर्थमन्यत् तत्र न कीर्तयेत् ।। (शांडिल्यस्मृति 2-22-24)
तीर्थजलाला शरीराच्या अवयवांनी क्षोभीत करु नये पायांनी पाणी उडवु नये (हल्ली हि फँशन झालीय हातानी एकमेकांवर पाणी उडवणे पाण्यात पाय सोडुन पाय हलवत बसणे) जलक्रीडा करु नयेत, पाण्यात चुळा टाकु नयेत (चुळा पाण्या बाहेर टाकाव्यात) शरीराचा मल वगैरे पाण्यात सोडु नये किंवा अशी कोणती गोष्ट करु नये ज्याने पाणी दुषीत होईल.
जे लोक हे नियम पाऴत नाहित ते धर्माच्या नावावर चुकीच वागताहेत हे संयुक्त नाहि.
स्नान करण्याआधी जलाची प्रार्थना करणे हि परंपरा आहे.
गंगा गंगेती यो ब्रुयात 。किंवा गंगेच यमुने चैव 。नमामी गंगे तव पादपंकजम् 。हे श्लोक म्हणुन “हर गंगे भागीरथी ” असा घोष करुन स्नान आजहि अनेक ठिकाणी केले जाते.


नन्दिनी नलिनी सीता मालतीच महापगा ।
विष्णुपादाब्ज संभूता गङ्गा त्रिपथ गामिनी ।।
भागीरथी भोगवती जान्हवी त्रिदशेश्वरी ।
द्वादशैतानी नामानि यत्र यत्र जलाशये।
स्नानोद्यत:स्मरेन्नित्यं तत्रतत्र वसाम्यहम् ।। (वाधुलस्मृति)
हा श्लोक म्हणुन गंगादि तीर्थांचे आवाहन करावे व नंतरच स्नान करावे.
स्नान झाल्यावर देव ऋषि व पितरांचे तर्पण करणे हि आवश्यक आहे ते केल्याशिवाय वस्त्र पिऴु नयेत कारण त्या वस्त्रांवरुन पडणारे पाणी जे तीर्थजल आहे ते ग्रहण करायला देव व पितर वायुरुपात येतात तर्पणाआधीच वस्त्र पिऴले तर ते निराश होवुन परत जातात.
वायुभूतास्तु गच्छन्ति तृषार्ता:सलिलार्थिन:।
तस्मान्न पीडयेद्वस्त्रमकृत्वा पितृतर्पणम् ।।
निराशास्ते निवर्तन्ते वस्त्रनिष्पीडने कृते ।
तस्मान्न पीडयेद्वस्त्रं ये केच इति मंत्रत:।। (वाधुलस्मृति 58-60)
अगदि शास्त्रकारांनी जो अंथरुणावर खिऴला आहे त्याला हि स्नानपर्याय दिला आहे.तो असा कि ज्याने मंगलस्नान केले आहे अशा व्यक्तिने या आजारी व्यक्तिस स्पर्श केला तरी त्या आजारी व्यक्तीस स्नान पुण्य मिऴते (हा अपवाद आहे.) हा नियम फक्त जागेवर खिऴलेल्यांकरता जाणावा.
स्त्रियांनी मात्र रोज केसांवरुन स्नान करु नये. त्यांनी गऴ्याखाली स्नान केले असताहि स्नान पुण्य आहे फक्त मंगल समयी, मंगलदिनी, रजोदर्शनसमाप्ती, व व्रताचरण समयी शिर:स्नान करावे.
लिहिण्यासारखे बरेच आहे परंतु तुर्त लेखन मर्यादा.
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading