👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८०६
तुझी गुण कीर्ति ऐकोनी आर्ते मन उचंबळलें । आलिंगना धाविन्नले उतावीळ ॥१॥ तनु मनु विगुंतलें मन वाचा गुंतलें । मी माझें विसरलें दर्शन गे माये ॥२॥ उतावेळपणे भुजा दंड उचलले । नेणोनी ठकले ठेले रूप पाहातांची बाईये ॥३॥ पातिया पातें नलगे पाहाणे तेंचि ठेलें । तैसें बापरखुमादेविवरें विठ्ठलें केलें गे माये ४ ॥
अर्थ:-
हे श्रीकृष्णा संताच्या मुखाने तुझे गुण व कीर्ति ऐकल्यामुळे तुझ्या भेटीविषयी माझ्या मनांत एवढी उत्कंठा लागली आहे की धांवत येऊन तुला केव्हा आलिंगन देईन असे मला वाटते. अशा उत्कट इच्छेमुळे माझे मन व वाणी तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी निमग्न होऊन माझ्या ठिकाणचा देहभाव नाहीसा झाला. मनाने तुला आलिंगन देण्याच्या उतावीळपणाने बाहु उचलले पण तुझ्या यथार्थ स्वरूपाचा विचार करता तुझे तसे स्वरूप नसल्यामुळे माझे ते उचललेले बाहु ठकले. डोळ्यांची टक लावून तुझ्या स्वरूपास पाहाणे हेही थांबले कारण तुझे स्वरूप डोळ्यांनी पाहण्याचा विषय नाही. याप्रमाणे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यानी माझी अशी स्थिति केली असे माऊली सांगतात.