
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५४७
देव ते कल्पित शास्त्र तें शाब्दिक । पुराणें सकळीक बाष्कळिक ॥१॥ बाहुले ती जीव सूत्रे तेचि जीव । मिथ्याचि माव जीव झालें ॥२॥ तेथें कैंचे मुक्त मुळी नाहीं बद्ध । सर्वही अबध्द दिसे जे का ॥३॥ अर्कापासूनी नीर जैसें कां भासत । जग तैसें घडत मिथ्याचि सत्य ॥४॥ ज्ञानदेव म्हणे सावधान होणें । अखंड साधणे परवस्तूशी ॥५॥
अर्थ:-
ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देवपणाची वाच्यता काल्पनिक आहे. शास्त्रे केवळ शब्दमय आहेत. पुराणामध्ये असंबद्धता आहे. कळसूत्रांच्या खेळातील, बाहुल्या व सूत्रे ही जशी परतंत्र त्याचप्रमाणे जीवही परतंत्र आहे. ज्या ठिकाणी बंधच नाही तेथे मुक्तीचा विचार कशाला तेंव्हा हा बंधमोक्षाचा शास्त्रांनी सांगितलेला व्यवहार अबद्ध नाही काय. ज्या प्रमाणे सूर्यकिरणावर मिथ्या मृगजळ भासते त्याप्रमाणे सर्व जगत् सत्य परमात्म्यावर भासते. सावधान राहून जग मिथ्यत्व निश्चय करून, परमात्मवस्तु प्राप्त करून घ्यावी. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.