ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.974

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९७४

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९७४

चिंचेच्या पानी एक शिवालय उभविलें आधीं कळसु मग पाया रे । देव पुजों गेलों तंव देऊळ उडालें प्रसिद्ध सद्गुरूराया रे ॥१॥ संतजनां महंतजनां तेथील तें गुज गोड रे । अनुभव अनुभवितां कदाचित सरे पुरेल मनींचे कोड रे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नोवरी । पितया कंकण करी माता सुंदरी विपरीत गे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरूगम्य कहाणी ऐकें सगुण विरूळा । बापरखुमादेविवरू विठ्ठलु पाहतां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥

अर्थ:-
या अभंगामध्ये चिंचेच्या पानी म्हणजे मायारूपी जी चिंच तीचे पाने म्हणजे अनंत देह असून त्या पानाच्या ठिकाणी अंतःकरणरूपी शिवालय निर्माण करून, आधि कळसु म्हणजे गर्भावस्थेमध्ये असलेला सोऽहं प्रत्यय म्हणजे (तो परमात्मा मी आहे असे ज्ञान) मग पाया रे म्हणजे, बाहेर आल्यानंतर कोऽहं हाच पाया आहे. कारण सधर्मक अंतःकरण सिद्धि कोऽहं वरच अवलंबून आहे. परंतु देवपूजेमध्ये प्रसिद्ध असलेले सद्गुरुंनी मला पूजा म्हणजे अभिन्नत्वाने ज्ञान करून दिले. त्या देवाभिन्न पूजेत देऊळ उडालें म्हणजे सधर्मक अंतःकरणाचा बाध झाला.व विशेषण उडाले. परंतु हे गुह्य संत महात्म्यांनाच गोड लागेल आणि अनुभव घेणारा याचीही वाच्यता न राहता त्याच्या मनाचे समाधान होईल. ‘उपजत नोवरी केळवली, म्हणजे सद्गुरूने महावाक्योपदेशजन्य तूं ब्रह्म आहेस असा वाङ्गनिश्चय झालेले नवरा नवरी यांचे लग्न झाले म्हणजे माता सुंदरी म्हणजे वृत्तिची आई असलेले जे अंतःकरण स्थिती तिने पितया म्हणजे आत्म्यास कंकण केली. कारण आत्म्यावर अंतःकरण अध्यस्त असल्यामुळे आणि अध्यस्त पदार्थ अधिष्ठानरूप असतो म्हणून ती आत्मरूप झाली. हे एक विपरीत कोडेच आहे. ही विपरीत कोड्याची काहाणी म्हणजे रीत जाणणारा एक गुरूपुत्र विरळा आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांनाच जाणले असतांना त्याच्या आनंदाच्या सुखसोहळ्याचा लाभ होईल. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading