👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ८४
सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥ लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥ नाम मंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरुनि राहें ॥३॥ निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी । इंद्रियांसवडी लपू नको ॥४॥ तीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥
अर्थ:-
जर सुख हवे असेल तर सर्व शास्त्रांनी निवडलेले नाम निवडुन जपत राहिले पाहिजे त्या शिवाय रिकामा राहु नकोस. हा संसाराचा व्यवहार लटिका आहे उगाच यात येरझारा घालु नकोस. एका नाममंत्राने कोटी पापे जातात त्यामुळे कृष्णनामाचा संकल्प धारण कर. हे करताना स्वतःची वृत्ती काढुन टाकुन द्यावी व इंद्रियांच्या आड दडु नये. तीर्थव्रतांमध्ये शुध्द नामभाव धरावा.मनी करुणा असावी. शांती दया ह्यांचा पाहुणा हरि होतो त्यामुळे त्यांचा अंगिकार कर. असा हा संजिवन समाधीचा ज्ञानमार्ग असणारा हरिपाठ श्रीगुरु निवृत्तिनाथानी सांगितल्यामुळे प्रमाण मानला असे माऊली सांगतात.
