👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५७४
ऐसे हैं अंडज सांगितले देवें । सांगोनिया भावे गिळीयेलें ॥१॥ गिळिला प्रपंच समाप्ती इंद्रियां । वैष्णवी हे माया बिंबाकार ॥२॥ निरशून्य शून्य साधूनि उपरम । वैकुंठीचे धाम हृदय केलें ॥३॥ जीव शीव शेजे पंक्तीस बैसली । पंचतत्त्वांची बोली नाहीं तेथें ॥४॥ तत्त्वीं तत्त्व गेलें बोलणे । वैखरीं वेदवक्ते चारी मान्य झालें ॥५॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति तुष्टला । सर्वांगे दिधला समबोध ॥६॥
अर्थ:-
देवानी ब्रह्मांड उत्पतीचा प्रकार सांगितल्यानंतर आत्मभावाने ते सर्व ब्रह्मांड गिळून टाकले म्हणजे बाधित केले. अर्थात ब्रह्मांडांतर्गत जीवांचा प्रपंच व त्याची इंद्रिये सर्वही गिळून टाकली. याचे मुख्य कारण हे आहे की चतुर्भुज परमात्म्याच्या ठिकाणी ज्या मायेने हे अध्यस्त ब्रह्मांड दाखविले ती माया ही परमात्मबाधा परमात्म स्वरूप झाली. कारण मिथ्या पदार्थ अधिष्ठानरूप असतो. शून्य म्हणजे जी माया तिला नाश करून ती नाहीशी झाला असता, सर्व माया कार्याचाच उपरम होतो.आणि वैकंठीचे परमात्मस्वरूपाचे निवासस्थान सहजच हृदय केले जाते. ज्याठिकाणी पंचतत्वाची भाषाच नाही त्या ठिकाणी पंचतत्वाचे कार्य के जीवेश्वर हे एकाच पक्तीला देऊन बसले मग जे त्यांच्या ठिकाणाची जीवभाव व शिवभाव जाऊन ते एक परमात्मरूप झाले हे काय सांगावयाला हवे. जीवतत्व परमात्मतत्वात एकरूप झाले हे वैखरीचे बोलणे चारी वेदाचे अध्ययन करणाऱ्या वेदवेत्त्यांनाही मान्य आहे. मला हा बोध श्रीगुरू निवृत्तीरायांनी संतुष्ट होऊन दिला त्यामुळे माझे पूर्ण समाधान झाले.असे माऊली सांगतात.
