👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५७३
अरे अरे ज्ञाना ज्ञान हे निवृत्ति । देहीं देहा उपरती तुज प्राप्त ॥१॥ अर्थावबोध अर्थुनी दाविला । ज्ञानिया तूं भला ज्ञानदेवा ॥२॥ सोहं तत्त्व साधलें प्रमाण सर्वत्रीं । उभयतां गात्रीं प्रेम तनू ॥३॥ बिंबी बिंब रसीं उपरम देखिला । प्रपंच शोखिला तुवां एकें ॥४॥ विष्णुनाम मंत्र सोहं तेज दिवटा । उजळून चोहटा शुद्ध केला ॥५॥ निवृत्तीचा शिष्य ज्ञानदेवी भाष्य । शांती समरस बोध उतरे ॥६॥
अर्थ:-
हे ज्ञानदेवा ज्या आत्मज्ञानाने देहातच देहाचा उपरम होतो ते निवृत्ती ज्ञान तुला प्राप्त आहेच. महावाक्यार्थाचा विचार करून ते ज्ञान तुला प्राप्त झाले म्हणुन ज्ञानोबा तुं फार धन्य आहेस. सर्व प्रमाणांनी सिद्ध केलेले जे सोहंतत्व ते तुला प्राप्त झाले म्हणुन तुझी व माझी अशी दोघांची तनु म्हणजे देह यांत आनंद भरुन राहिला. अखंड एकरस बिबरूप जो परमात्मा त्यांत प्रतिबिंबरूप तुझाआत्मा उगम पावला.ऐक्य झाल्याने तूं एकट्यानेच सर्व प्रपंच शोसुन टाकलास व बाधीत केलास. तूं सोहरूपी आत्मतेजाचा दिवटा घेऊन विष्णनामाचा मंत्र उजळून भक्तीमार्गाचा चोहटा स्वच्छ केलास.निवृत्तीरायांचा शिष्य जो मी माझ्याठिकाणी निवृत्तीरायांनी शांकरभाष्यानुरूप अद्वैतशांतिचा जो बोध केला त्यामुळे सर्वत्र समभाव मला प्राप्त झाला. असे माऊली सांगतात.
