👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५०७
सरिता येऊनियां चढती ब्रह्मगिरी । परी ज्ञानी न धरी जन्म कांहीं ॥१॥ चंदनासी होय बाभुळत्व प्राप्ती । परी ज्ञानी शिवती जन्म कांहीं ॥२॥ जळाला कापूर मागुता प्रकटे । परी ज्ञानिया न घडे जन्म कांहीं ॥३॥ वारा वागुरेसी धरूनी कोंडुंये । परी ज्ञानी नसये जन्म कांहीं ॥४॥ ज्ञानी ज्ञानेश्वर मिळोनियां गेला । मरण्या जिण्या झाला वेगळाची ॥५॥
अर्थ:-
ब्रह्मज्ञानी पुरूषाला पुनर्जन्म नसतो जर वाहात चाललेल्या नद्या उलट पर्वतांवर चढतील तर ज्ञानी पुरूषाला जन्म येईल. चंदनाच्या झाडाला जर बाभूळीचे रूप येईल जळलेला कापूर जर पुन्हा पहिल्यासारखा दिसेल अथवा वारा जर जाळ्यांत सापडेल तर ज्ञानी पुरूषाला पुन्हा जन्माला यावे लागेल तात्पर्य ब्रह्मज्ञानी पुरुषाला पुन्हा पुनर्जन्म प्राप्ती नाही. आम्ही ज्ञानवान झाल्यामुळे जन्ममरणातून मुक्त झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.