👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५०६
केवळ निराभास या जगीं जाहला । नाहीं आन उरला भास कांहीं ॥१॥ संकल्प विकल्प असती मनाचे । छेदियले साचे भवभ्रम ॥२॥ वासनेचे मूळ टाकिलें खणोनी । जिवित्व गिळूनी शिवरूप ॥३॥ काम क्रोध लोभ दडले ते सहज । केले अति चोज सांगवेना ॥४॥ ज्ञानेश्वर नाम हेही गिळूनियां । मूळ अंती मायातीत शुद्ध ॥५॥
अर्थ:-
आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याचा प्रकाशक दुसरा कोणीही नाही. म्हणून त्याला निराभास म्हणतात. हे जगत, निराभास आत्मरूपच झाले त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही भासण्याला राहिले नाही. जगत म्हणजे काय विचाराल तर ते मनकल्पित आहे. ते आत्मज्ञानाने जर दूर केल्यास संसार भ्रमाचा निरास होईल. मग जीवाचा जीवपणा जाऊन तो जीव शिवरूप होतो. असे झाल्यामुळे काम क्रोध, लोभ यांचा निरास होऊन जातो. माझी कायारूप भ्रांती नाहीसी झाल्यामुळे माझ्या ठिकाणी ज्ञानेश्वर हे नांव देखील उरले नाही म्हणजे मी शुद्ध स्वरूप झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.