👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ९८
जन्मजन्मांतरी । असेल पुण्यसामुग्री । तरीच नाम जिव्हाग्री । येईल श्रीरामांचेधन्य कुळ तयाचे । रामनाम हेचि वाचे । दोष हरतील जन्माचे । श्रीराम म्हणतांचि ॥ कोटीकुळाचे उद्धरण । मुखी राम नारायण । रामकृष्ण स्मरण । धन्य जन्म तयाचे ॥ नाम तारक सांगडी । नाम न विसंबे अर्धघडी । तप केले असेल कोडी । तरीच नाम येईल ॥ ज्ञानदेवी अभ्यास मोठा । नामस्मरण मुखावाटा । पूर्वज गेले वैकुंठा । हरी हरी स्मरता ॥
अर्थ:-
जन्मजन्मातंरीची पुण्याई असेल तरच श्रीरामाचे नांम जिव्हाग्री येते. श्रीराम असे म्हणताच त्याचे जन्माचे दोषांचे हरण होते. रामनाम वाचेने घेतले की त्याचे कुळ धन्य होते. मुखात राम नारायण ही नामे घेतली तर कोटी कुळे उध्दरतात व रामकृष्ण नामाच्या स्मरणाने त्याचा जन्म धन्य होतो. त्या नामाची सांगड बांधली, अर्धक्षण ही नामाशिवाय न राहता तप केले तरच नाम मुखात येते. हरिस्मरण करता करता पुर्वज वैकुंठाला गेले. माझा मोठा अभ्यास नामस्मरण करताना होतो असे माऊली सांगतात.
