
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २९०
शून्याशून्याधार शून्यशेजे हरि । शून्यामाजी घरी बिंबलासे ॥१॥ आधीं आप पाहीं शून्याशून्य देहीं । मग उमजोनी ठायी घेईजे सुखे ॥२॥ शून्य तें काई शून्याशुन्य पुशिलें । हृदयस्था जालें कोण्या गुणें ॥३॥ बापरखुमादेविवर विठ्ठल अवघा । शून्याशून्य वेग ज्ञानधन ॥४॥
अर्थ:-
जगाची अव्यक्त अवस्था म्हणजे शून्य. त्या शून्याचा आधार जी मिथ्या माया तीही शून्यच म्हणजे सत्तास्फुर्ति विरहित, शून्याचा आधार जी माया तिची सेज म्हणजे,आश्रयस्थान जो श्रीहरी परमात्मा तो शून्यरूप मायेमध्ये प्रतिबिंबित झाला आहे. असे अगोदर स्वतः पहा. शून्याशून्य म्हणजे स्थूल, सूक्ष्म रूपी देहांत याचा विचार करून स्वतःचेच ठिकाणी त्या परमात्म्याचे सुख घे. शून्याचा म्हणजे, मायेचा विचार केला असता शून्याशून्य रूप जो स्थूल सूक्ष्म रुप ते पुसून जाते मग कोणत्या गुणांनी हृदयस्थ परमात्मा शून्याशून्यरूप जे ते कसा बनणार.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच सर्व काही आहेत. असे माऊली सांगतात.