👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २२९
दुजेपणाचा भावो वायां वाढविसी गव्हारा । उतराई या देहा कैसा होशील । दुजेपणे पाहासी तरी देही देवो पाही । सेखी दुजेपण नाही तूंचि येकला रया ॥ भ्रांती पडलिया मना नेणसी । ब्रह्मसुख चुकलासी वर्म अरे मुढा ॥ ते कल्पिलिया नकळे गुरुकृपे वेगळे । वायाविण उगले का धांवतोसी सैरा ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु जन्मोजन्मी वोळगिला अससी । तरी ते खूण पावसी निभ्रांत रया ॥
अर्थ:-
गावंढळा एकात्म पदार्थाचा द्वैतभाव उगीच कां वाढवितोस असे द्वैत वाढविला तर यादेहापासून उतराई कसा होशील.द्वैतात परमात्म स्वरुप नाही. ते तुझ्या देहातच आहे ते पहा तरी दुसरेपणा नाहीसा होऊन तू एका आत्मरुपानेच राहशील.भ्रांती पडलेल्या मनाला ब्रह्मसुख प्राप्त होत नाही. परमात्मस्वरुप श्रीगुरु कृपेशिवाय नुसत्या कल्पनेने कळत नाही. श्री गुरुकृपाप्राप्त न करुन घेता विनाकारण सैरा का धावतोस. माझे पिता रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्याची अनंत जन्म उपासना केली असली तरच खात्रीने परमात्म सौख्य तुला प्राप्त होईल.असे माऊली सांगतात.