👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १४६
रामकृष्ण गोविंदाचे नामस्मरण वाचे । घडिये घडिये सांचे ध्यान श्रीविठ्ठलाचें ॥ एकनाम आठविंता दूतां पडियेली चिंता । नाम आनंदे गातां पाविजे सायुज्यता ॥ तिहीं लोकीं नाम थोर वेदशास्त्राचे सार । सगुण निर्गुणाकार निज ब्रह्मा सार ॥ बापरखुमादेविवरू कृपाळू उदारू । नामस्मरणें पारू उतरी हा निर्धारू ॥
अर्थ:-
रामकृष्ण या नामाचे स्मरण वाचेने करावे व सतत विठ्ठलाचे ध्यान करावे. एक नाम वाचेने घेतल्याने त्या अजामेळाला यमदूतांना सोडावे लागले होते. अशा नामस्मरणाने आपले कसे होणार याची चिंता यमाला लागून राहिले आहे. नाम आनंदाने गायले तर सायुज्जता मिळते.सगुण, निर्गुण,निजब्रह्म असलेले नाम हे थोर असून वेदशास्त्राचे सार आहे. माझे पिता आणि रखुमाईचे पती विठ्ठल कृपाळू व उदार असून ते त्यांच्या नामस्मरणाने भवसागर पार होतो अशी खूणगाठ बांध असे माऊली सांगतात.