👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग १३
लाऊनी मनगणीची दोरी । विपरीत तयाची कुसरी । अकळु न कळे श्रीहरि । अवघड ओडंबर तुझें ॥ अष्टदळ कमळाची वोवरी । विपरीत तयाची कुसरी । एकवीस खणांचे उपरी । बाहीजु कां हरि दाखविली ॥ तेथें रात्रीं दिवस नेणिजे । सोहं प्रकाश सहजे । नाचविसी पंचभूते वोजें । कवतुक तुझे तूं पाहसी ॥ भानु निसियेचा कुसावा । येक राहिले याचिया आशा । येक म्हणति अढळ धुरु कैसा । तयाचा भरंवसा त्यांसी नाहीं ॥ ऐसीं तयाचीं बोलणीं । अंगी राहिलीं खेळणीं । साही पावठणी करुनी । सातावरि घातु मांडिला ॥ करी घेऊनि आळवणी । करुं नेणें वोवाळणी । बापरखुमादेविवरा विठ्ठला चरणीं । चौघी जणी निमालिया ॥
अर्थ:-
मनाची दोरी करुन त्याला बांधायला गेले तर तो नीट दिसतच नाही.तो अकळ आहे. असे अवघड अवडंबर तु रचले आहेस.हृदयातील अष्टदळ कमळ व २१ खण म्हणजे पंचप्राण, पंच कर्मेद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये, पंच विषय व एक चित्त जरी असले तर त्याची विपरित अशी त्याची कुसरी आहे. त्याच्या ठायी रात्रंदिवस दिसत नाही,सोहं प्रकाश सहज दिसतो, पंचमहाभूतांना तो नाचवत असतो त्याचे कौतुक मी पाहात आहे. सुर्याने निवडलेले राहणे किंवा ध्रुवाने निवडलेले अढळस्थान हे एकच राहिल याचा भरवसा त्यांना ही नाही. असे याचे बोलणे आहे व सहा शास्त्रांची त्याने खेळणी केली आहेत. ती सहा शास्त्रे त्याला वर्णु शकत नाहीत पण त्याच्यात ती सर्व एकत्र लुप्त होतात.जशी एखादी सवाषिण हातात निरांजन घेऊन ओवाळणी करते तशी परा, पश्यंती मध्यमा वैखरी ह्या त्या विठ्ठलाच्या पायी निमाल्या आहेत असे माऊली सांगतात.