ग्रामगीता अध्याय २ धर्माध्ययन

🕉ग्रामगीता अध्याय २ धर्माध्ययन
धर्माध्ययन
॥ श्रीगुरूदेवाय नम : ॥
देवे निर्माण केली क्षिती । प्रजा वाढवी प्रजापति । मानवसमाज राहाया सुस्थिती । धर्म सकळा निवेदिला ॥१॥
" धर्म " बोलावया शध्द एक । परि त्याचा विस्तार अलौकिक । लौकिक आणि पारमार्थिक । मिळोनिया ॥२॥
अनेक प्राणी जेथे राहती । त्या सर्वाची राहावी सुस्थिती । समान समाधानाची गति । त्यास धर्म म्हणावे ॥३॥
आत्मरूपाची धारणा । सर्वाठायी समभावना । विश्वकुटुंब ऐशा आचरणा । धर्म म्हणावे निश्चये ॥४॥
आपुली साधावी उन्नति । सौख्य द्यावे इतरांप्रति । या उद्देशे जी जी संस्कृति । धर्म म्हणावे तिजलागी ॥५॥

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

🕉ग्रामगीता अध्याय २ धर्माध्ययन
धर्माध्ययन
॥ श्रीगुरूदेवाय नम : ॥
देवे निर्माण केली क्षिती । प्रजा वाढवी प्रजापति । मानवसमाज राहाया सुस्थिती । धर्म सकळा निवेदिला ॥१॥
” धर्म ” बोलावया शध्द एक । परि त्याचा विस्तार अलौकिक । लौकिक आणि पारमार्थिक । मिळोनिया ॥२॥
अनेक प्राणी जेथे राहती । त्या सर्वाची राहावी सुस्थिती । समान समाधानाची गति । त्यास धर्म म्हणावे ॥३॥
आत्मरूपाची धारणा । सर्वाठायी समभावना । विश्वकुटुंब ऐशा आचरणा । धर्म म्हणावे निश्चये ॥४॥
आपुली साधावी उन्नति । सौख्य द्यावे इतरांप्रति । या उद्देशे जी जी संस्कृति । धर्म म्हणावे तिजलागी ॥५॥
परस्पराशी वागणूक । ज्यात न्याय – नीति सम्यक । प्रत्येकांचे कर्तव्य चोख । धर्म ऐसे त्या नांव ॥६॥
कोणाचा द्रोह न करून । करावा ऐहिक उत्कर्ष पूर्ण । साधावे आत्मसमाधान । हाचि बाणा धर्माचा ॥७॥
सर्वास असावा संतोष । दुःख न व्हावे प्राणीमात्रास । याचा सक्रिय कराया अभ्यास । धर्मनीति बोलली ॥८॥
भिन्न लोकांची भिन्न कामे । मिळोनी पुरती जीवनकर्मे । असोत भिन्न गुण भिन्न नामे । परि सुख सर्वाचे सहकारी ॥९॥
नको सत्तेचा बडगा त्यासि । नको दंडभय सत्कर्मासि । आपापले कर्म सर्वासि । धर्म शिकवी सर्वांगे ॥१०॥
धार्मिक त्यासचि म्हणावे । सत्तेवाचूनि वागे बरवे । स्वये आपुल्याचि स्वभावे । समरस होई सर्वाशी ॥११॥
नको वैद्य अथवा डॉक्टर । आपणचि राहे आरोग्यतत्पर । नको वकील न्यायाधीश दंडधर । न्यायव्यवहार सहजचि ॥१२॥
नको धाक तलवारीचा । चुकीस्तव तळमळे आत्मा साचा । साक्ष देतो अंकुश देवाचा । अंतरामाजी ॥१३॥
ऐसे ज्याचे हृदयी स्फुरण । तोचि खरा धर्मवान । बाह्य अवडंबर धर्मचिन्ह । ते ते गौण, धर्म नव्हे ॥१४॥
शुध्द सात्विकता प्रकट करावी । लौकिकी तीच जागवावी । आपुल्या चारित्र्याने सांभाळावी । सुव्यवस्था जगाची ॥१५॥
व्यक्तिधर्म, कुटुंबधर्म । समाजधर्म, गावधर्म । बळकट होई राष्ट्र्धर्म । प्रगतिपथाचा ॥१६॥
व्यक्ति व्हावी कुटुंबपूरक । कुटुंब व्हावे समाजपोषक । तैसेचि ग्राम व्हावे राष्ट्रसहाय़क । राष्ट्र विश्वाशांतिदायी ॥१७॥
याकरिता जी जी रचना । तियेसि धर्म म्हणती जाणा । देशद्रोह अधार्मिकपणा । एकाच अर्थी ॥१८॥
मुख्य धर्माचे लक्षण । त्याग अहिंसा सत्य पूर्ण । अपरिग्रह ब्रम्हचर्य जाण । तारतम्ययुक्त ॥१९॥
निर्भयता शरीरश्रम । परस्पराशी अभेद प्रेम । पूरक व्हावया विद्या सत्कर्म । सकलासाठी ॥२०॥


सर्व विश्वची व्हावे सुखी । ही धर्माची दृष्टी नेटकी । ती आणावी सर्व गावलोकी । तरीच लाभ ॥२१॥
विश्वाचा घटक देश । गाव हाचि देशाचा अंश । गावाचा मूळपाया माणूस । त्यासि करावे धार्मिक ॥२२॥
व्यक्तिधर्म सर्वा कळावा । कुटुंबधर्म आचरणी यावा । ग्रामधर्म अंगी बाणावा । राष्ट्रधर्माच्या धारणेने ॥२३॥
व्यक्ति – व्यक्ति व्हावी धार्मिक । धर्म नव्हे एकांगी लटक । भौतिक आणि पारमार्थिक । विकास व्हावा सर्वाचा ॥२४॥
प्रत्येकासि शरीर, मन । वाणी, इंद्रिये, बुध्दि, प्राण । या सर्वाचे विकास साधन । तोचि धर्म ॥२५॥
ऐशा सदधर्माचे ज्ञान । आधी प्राप्त व्हावे सर्वांगीण । मगचि त्यासारिखे जीवन । जगता येई या लोकी ॥२६॥
यासाठीच आश्रमव्यवस्था । पूर्वजांची उत्तम प्रथा । आरंभी मिळे धर्माची संथा । पुढे जीवन धर्ममय ॥२७॥
मानव पशूयोनीतूनि आला । नराचा नारायण होणे त्याला । यासाठी संस्कार देऊनि सावरिला । क्रमाक्रमाने ॥२८॥
मानवाकडोनि जे जे घडते । ते बरे – वाईट दोन्ही होते । त्यातूनि निवडावे लागते । पापपुण्य ॥२९॥
त्यांचे सुधारोनि आचरण । द्यावे लागते नवे वळण । जेणे आपले करील उध्दरण । इतरा सहायक होऊनि ॥३०॥
यासाठी धर्मे नेमिले संस्कार । आश्रम गोविले जीवनी चार । आयुष्य कल्पूनि वर्षे शंभर । विभागले ते उन्नतिस्तव ॥३१॥
मानवजीवनी करिता पर्दापण । ब्रम्हचर्याश्रम लागे जाण । जो सर्व आश्रमांचे मूलस्थान । पाया म्हणावा जीवनाचा ॥३२॥
ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला । त्याचा पुढील काळ सुखी गेला । मग प्रत्येक आश्रम त्याला । उत्कर्षदायी होतसे ॥३३॥
या ब्रह्मचर्याश्रमचे साधन । चाले गर्भधारणेपासून । पोटातचि असता जीव पडोन । जतन करावा संस्कारे ॥३४॥
संस्कार दुष्परिणामकारी । न पडावे आतील गर्भावरि । म्हणोनी मातापित्यांनी सदाचारी । राहावे सदभावे ॥३५॥
न करावे अश्लील भाषण । न बघावे दृष्य हीन । न राहावे व्यसनाधीन । दुर्गुणी अन्न न खावे ॥३६॥
आहारविहार सात्विक पूर्ण । उत्तमगुणी चिंतन वाचन । न ऐकावे शृंगारगायन । गर्भवतीस घेवोनि ॥३७॥
येथोनि पाहिजे जतन केले । पुढे मूल जन्मासि आले । तेव्हापासूनि संस्कार घडले । पाहिजेत सत्कर्माचे ॥३८॥
घरी पुत्ररत्न जन्मले । काही दिवस त्याचे कौतुक केले । परि जन पुढे पाहू लागले । कर्तव्य तयाचे ॥३९॥
मुलगा काय खेळणे खेळतो । काय बघतो कोठे जातो । कैसा बोलतो चालतो गातो । पाहती जन ॥४०॥


मुलास जैसे कळो लागले । तैसे त्यास सांभाळणे अवश्य झाले । त्याचे समोर न पाहिजे बोलिले । दुर्विषय कोणी ॥४१॥
त्यावरि उत्तम संस्कार घडावे । म्हणोनीच व्रतबंधादि बरवे । शिकवावे पाठ करोनि घ्यावे । उत्तम विषय ॥४२॥
मग जो तो त्यासि म्हणे । काय रे ! केले की नाही वाचणे ? कैसा फिरतोसि रानेवने । वेडया – पिशासारिखा ? ॥४३॥
तुज नाही का संस्कार । घडावया सदगुणी व्यवहार ? काय करिती पालक चतुर ? लक्ष नाही तुझ्यावरि ॥४४॥
सांगितली नाही का स्नानसंध्या । स्मरावयासि जगदवंद्या ? नमस्कारिले नाहीस का प्रतिपाद्या । सकाळी सायंकाळी जाऊनि ? ॥४५॥
मग का फिरतोसि रानावना ? कैसा होशील शहाणा ? उपदेश देती ऐसा, सदगुणा । वाढवाया जन थोर ॥४६॥
घडावया उत्तम संस्कार मायबाप शिकविती सदाचार । व्हावया उत्तम गुणी चतुर । मोठेपणी ॥४७॥
आठवर्षांचे आतचि त्याला । पाहिजे उपनयन संस्कार केला । तोहि नको रूढीचा बांधला । नाटक नुसते बटूचे ॥४८॥
उपनयन म्हणजे विद्येचे व्रत । ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात । गुरुजवळी करणे समर्पित । जीवन त्याचे घडवावय़ा ॥४९॥
तोहि गुरु असावा ब्रह्मचारी । अथवा वानप्रस्थ तरी । त्याने घ्यावी काळजी पुरी । मुलांचिया ब्रह्मचर्याची ॥५०॥
त्याचे राहणे खाणे पिणे । खेळ खेळणे ग्रंथ वाचणे । लक्ष ठेवावे आचार्याने । मनोरंजनादिकावरि ॥५१॥
जरा चुकलिया चुकतचि जाते । मग सावरेना काही केल्य़ा ते । इंद्रिया वळण जैसे लागते । तैसेचि होते जन्मभरि ॥५२॥
म्हणूनि गुरुआश्रमी नियम । प्रत्येक आचरणी संयम । छात्रालयी हीच उत्तम । दॄष्टी असावी सर्वत्र ॥५३॥
मुलगा अभ्यासा लागला । की सात्विक खाणे असावे त्याला । खारट आंबट तिखट मसाला । देऊ नये भोजनी ॥५४॥
चमचमीत चुरचुरीत । अति मधुर तळीव पदार्थ । अथवा रुक्ष कृत्रिम मिश्रित । भोजनासि न द्यावे ॥५५॥
साधे ताजे अन्न द्यावे । वेळेवरि झोपवावे जागवावे । झोपता जागता जवळी नसावे । स्पर्शणारे कोणी ॥५६॥
कराया लावावे प्रातर्ध्यान । सांयकाळी प्रार्थना पूर्ण । झोपता जागता चिंतन । आदर्श महापुरूषांचे ॥५७॥
नित्य नियमे उषःपान । सुर्यनमस्कार आसन । पोहणे आणि निंबसेवन । आरोग्यदायी जे सोपे ॥५८॥
शीतजले करवावे स्नान । सकाळी रानीवनी गमन । करवावे नेहमी पठणपाठण । चारित्र्यवंतांचे ॥५९॥
शौकिन राहणी वर्जावी । सुगंधी अत्तरे फुलेहि त्यजावी । कोणी बाल न ठेवी तेल न लावी । ऐसे करावे ॥६०॥


बघू न द्यावे दर्पणी तोंड । वाढू न द्यावे पोषाखाचे बंड । पान बिडी चहाचे थोतांड । सर्वतोपरी वर्जावे ॥६१॥
कोणीहि न घ्यावे मादक द्रव्य । तोंडी नसावे नाटकी काव्य । समजावूनि द्यावे सेव्यासेव्य । उपवासहि करवावा ॥६२॥
कराया सांगावे आपुले काम । दुसर्‍यासाठीहि परिश्रम । शिकवावे बंधुभगिनी – प्रेम । सेवाधर्म शिकवावा ॥६३॥
बसवू नये मुलींसह शिक्षणी । तेथे संमिश्र नाटके कोठोनि ? स्त्रैणासंगती शृंगारगायनी । क्षणभरीहि बसो न द्यावे ॥६४॥
मुलाचे वय जसजसे वाढे । तोडावे स्त्रियाचे संबंध गाढे । नेहमी चरित्रवंतांचे धडे । द्यावेत तयासि ॥६५॥
विवाहादि कार्ये न दाखवावी । शृंगारकाव्ये न शिकवावी । व्यायाम दंगली खेळवावी । मुले निर्भयत्वे ॥६६॥
अश्लीलता कोठेहि न दिसावी । दिनचर्या आदर्श असावी । सकाळी सायंकाळी द्यावी । बौध्दिके ब्रह्मचर्याची ॥६७॥
सांगावे ब्रह्मचर्याचे महिमान । ब्रह्मचर्याचा उद्देश कोण । काय सेविल्या होते रक्षण । ब्रह्मचर्याचे ॥६८॥
ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचरण । ब्रह्मतेजाचे साधन । विद्याप्राप्तीचे वर्तन । वीर्यरक्षण ब्रह्मचर्य ॥६९॥
ब्रह्मचर्यासमान कोण । जगी महत्त्वाचे साधन ? जो ब्रह्मचर्य करी पालन । तो देवासमान होतसे ॥७०॥
रिध्दिसिध्दी त्याच्या दासी । देव धावती त्याच्या हाकेसि । सूर्यासमान कांति तयासि । लाभतसे निरोगी ॥७१॥
भीष्मचा व्रतनिश्चय । कार्तिकेयाचे चातुर्य । शुकाचा ज्ञानयोग निर्भय । लाभे ब्रह्मचर्याने ॥७२॥
अवधूताची दृष्टी विशाल । हनुमंताचे महाबल । ब्रह्मचारी पावे महाचपल । वज्रदेह ॥७३॥
सर्व बळात वीर्यबळ । वीर्य नाही तो दरिद्री दुर्बळ । रोगांचिया मुखीचा कवळ । नेहमी होतो ॥७४॥
ज्याने वीर्य सांभाळले । यश तयासि माळ घाले । वीर्य क्षीण होता मृत्युने केले । शिकार त्यासि ॥७५॥
वीर्या अंगी आहे ओज । वीर्या अंगी नवे तेज । वीर्या अंगी आरोग्यबीज । बुध्दिसामर्थ्यहि ॥७६॥
ऐका वीर्य कैसे बनते । चाळीस शेर अन्न पचते । त्याचे एक शेर रक्त होते । वीर्य त्याचे दोन तोळे ॥७७॥
पुरुष रोज एक शेर जेवला । तरी एक महिना तीस शेराला । त्यात दीड तोळा उपजला । वीर्यरसबिंदु ॥७८॥
तो नष्ट होय एका क्षणी । केवढी थोर केली हानि ! द्रव्य मिळविले कष्ट करोनि । केली धुळधाणी हौसेने ॥७९॥
ब्रह्मचारी पतन पावला । महिन्याची कमाई खोवतो क्षणाला । केवढा हा तोटा झाला । आयुष्याचा ? ॥८०॥


साता दिशा अन्नरस होई । तो साता दिसा रक्तपण घेई । रक्तामधूनि मांस होई । थोडे थोडे ॥८१॥
त्यातूनि मेद आणि हाडे । साता दिसा मज्जा वाढे । मग वीर्य निपजे थोडथोडे । सप्ताहानंतरी ॥८२॥
बेचाळीस दिवसानंतर । वीर्य शुक्रधातु शक्तिकर । त्यासि किती प्रयास दिवसरात्र । अन्नखर्च कितीतरी ॥८३॥
ते अमोल वीर्य देहातील रत्न । ज्यावरि देहाचे जीवन । ते आरोग्यदायी अमृतकण । तेज वाढे रोमरोमी ॥८४॥
म्हणून यासि सांभाळावे । ओज सामर्थ्य वाढवावे । सूर्यचंद्रापरी शोभावे । ब्रह्मचर्याने ॥८५॥
ऐसे शिकवावे बाळा तरुणा । बौध्दिक द्यावे सर्व जना । बुध्दि बनता वेळ लागेना । जीवन आदर्श व्हावया ॥८६॥
गुरुजनी ऐसे द्यावेत धडे । आपुला आदर्श ठेवोनि पुढे । विद्यार्थी तयार होता चहूकडे । राष्ट्र होई तेजस्वी ॥८७॥
चोवीस वर्षे ऐसी गेली । त्याची जीवन – सफलता झाली । गृहस्थपणे गुढी उभारली । सत्कार्याची त्यापुढे ॥८८॥
ब्रह्मचारी घे गृहस्थपण । शंभर वर्षे जगे तयाचे संतान । रोगराई दुबळेपण । तया न बाधे सर्वथा ॥८९॥
यानेच गाव होईल आदर्श । बलवान बनेल सर्व देश । मानवासमाजाचा उत्कर्ष । होईल सर्वतोपरी ॥९०॥
हे साधाया पहिला उपक्रम । पाहिजे ब्रह्मचर्याश्रम । जेणे प्रजा होई कार्यक्षम । स्वतःसाठी तैसी राष्ट्रासाठी ॥९१॥
राष्ट्रासाठी जीवन बनविणे । त्यासि चारित्र्ययोग संपादणे । आरोग्यबल शरीरी राखणे । ब्रह्मचर्यायोगे ॥९२॥
परस्परात प्रेम राखणे । समाजाकरिता तत्पर होणे । त्यासाठीहि आधी जीवन बनविणे । हाचि पाया आवश्यक ॥९३॥
जे हे नियम मुलांसाठी । तीच मुलींकरिता रहाटी । वयाचीच मुख्य विषमता पोटी । राही तयाच्या ॥९४॥
भारती झाल्या ब्रह्मचारिणी । विद्यासंपन्न तेजस्विनी । त्यांचे आश्रम स्वतंत्र स्थानी । आदर्शरूप ॥९५॥
जोवरि हे होते आश्रम । तोवरि राष्ट्र बलवान उत्तम । वाढूनि व्यसने विषयप्रेम । पतन झाले समाजाचे ॥९६॥
धर्माचा पाया विद्यार्थीधर्म । तयासाठी ब्रह्मचर्याश्रम । त्यानेच जीवन होईल उत्तम । व्यक्तीचे आणि राष्ट्राचे ॥९७॥
म्हणोनि साधा या व्रतनियमाला । असेचि आश्रम काढा गावाला । शिकवा आपुल्या भावी पिढीला । लक्ष देऊनि मित्रहो ! ॥९८॥
मी हे जाणतो मागील वर्म । त्याकाळी सुलभ श्रध्दा संयम । तैसे आज करिता आश्रम । कठीण जाईल गावासि ॥९९॥
उपभोग सकलांचे वाढले । राहणीमाजी अंतर पडले । सभोवताली तार चढले । विषयसतारीचे ॥१००॥
मुलींचे विद्यालय अलग नाही । विधवाहि शृंगाराविण न राही । धाक कोणाचा कोणाहि । उरला दिसेना ॥१०१॥
नटवेष घुसले जीवनी । भुलविले चित्रपट – कादंबर्‍यांनी । अध्यापक तोचि विलासी व्यसनी । शृंगारकाव्य शिकवितो ॥१०२॥
रस्तोरस्ती खाद्य पेये । वैभवशाली विद्यालये । चैन हेच जणू जीवन ध्येय । कोणी सोय लावावी कोणा ? ॥१०३॥
ऐसे वातावरण जरी असले । तरी ह्रदयवंताने पाहिजे सुधारले । आपुले गाव बिघडू दिले । ऐसे न करावे सुज्ञाने ॥१०४॥
नियमित मुलांचे वर्तन । नियमित ठेवावे खानपान । नियमित ब्रह्मचर्याचे पालन । घडलेंच पाहिजे ॥१०५॥
सर्व भुक्तिमुक्तिसि कारण । असे ब्रह्मचर्य धर्मज्ञान । म्हणोनि विनवितो श्रोतेजन । इकडे दुर्लक्ष न व्हावे ॥१०६॥
ऐसे साधाल जेवढयापरी । संतान बळकट होई संसारी । गावाचे स्वास्थ वाढेल निर्धारी । तुकडया म्हणे ॥१०७॥
इति श्री ग्रामगीता ग्रंथ । गुरू – शास्त्र – स्वानुभव – समंत । धर्म ब्रह्मचर्य निवेदिले येथ । दुसरा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
ग्रामगीता अध्याय दुसरा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading