👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५२९
शून्य निरसुनी दोन्ही निरखिलें । तेथुनी देखिलें निजवस्तु ॥१॥ स्वप्रकाशमय आत्मा सदोदित । सर्वत्र भरीत एकमेव ॥२॥ ध्येय ध्याता ध्यान तिन्ही निरसुनी । झालो निरंजनी लीन आथी ॥३॥ अहं हे स्वरुप गिळूनियां पाहीं । देहींच ही स्वसंवेद्य ॥४॥ बापरखुमादेविवर विठ्ठलाचा दास । झाला समरस परब्रह्म ॥५॥
अर्थ:-
सत्ता स्फूरतिशून्य असलेले अहम्’आणि ‘मम’ यांचा निरास करुन निरखून पाहिले तेव्हा निजवस्तूला पाहिले. पुढे त्यांचा निरास झाल्यामुळे ब्रह्मस्वरूप कळले, तेच तेजोमय ब्रह्म आत्मा’ या संज्ञेने प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भरलेले आहे. असे ज्ञान झाले. नंतर ध्याता ध्यान व ध्येयही त्रिपुटी निरसून मी आत्मरुप बनलो. अहंकार टाकून या देहातच मी विदेह स्वरुपाने स्वसंवेद्य आहे. माझे पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंगांचा दास जो मी, तो ब्रह्मस्वरुपासी समरस झालो. असे माऊली सांगतात.