दृष्टांत 117 देव करतो, ते बरे करतो

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

  *परमेश्वराची योजना…*

       एकदा स्वर्गातून घोषणा करण्यात आली की, देव सफरचंद वाटायला येत आहेत… सर्व माणसे देवाच्या प्रसादासाठी रांगेत उभी होती… एक लहान मुलगी खूप उत्सुक होती… कारण ती पहिल्यांदा देवाला बघणार होती… ती देवाची कल्पना करत मनातल्या मनात खूप खूष होती… देव रांगेतल्या लोकांना सफरचंद वाटू लागले, तिचा क्रमांक आला, देवाने तिला मोठं आणि लाल सफरचंद दिलं… ती रांगेतून बाहेर पडताच तिचे सफरचंद हातातून निसटून ते चिखलात पडलं… मुलगी उदास झाली…

       आता तिला दुसऱ्यांदा रांगेत उभे राहावं लागणार… दुसरी रांग पहिल्यापेक्षा लांब होती, परंतु दुसरा कोणताच मार्ग नव्हता… सर्व लोक प्रामाणिकपणे रांग लाऊन प्रसाद घेऊन जात होते… शेवटी ती मुलगी पुन्हा रांगेला लागली आणि तिचा क्रमांक येण्याची वाट पाहू लागली… अर्ध्या रांगेतच सफरचंद संपत आले… मुलगी उदास झाली… तिला वाटलं, आपण येईपर्यंत सफरचंद संपतील… परंतु तिला माहीत नव्हते की, देवाचं भांडार कधी रिकामे होत नाही…

       तिचा क्रमांक आला, तोपर्यंत आणखी नवे सफरचंद आले… देवाने तिच्या मनातलं ओळखलं… ते तिला सफरचंद देत म्हणाले की, पहिल्यांदा जे सफरचंद तुला दिलं होतं, ते एका बाजूने सडलेले होतं… तुझ्यासाठी ते योग्य नव्हते… म्हणून मीच ते तुझ्या हातातून पाडलं होत… दुसऱ्यांदा तुला लांब रांगेत यासाठी उभं राहू दिलं, कारण सफरचंद तेव्हा झाडाला होते… ते यायला वेळ होता… म्हणून तुला जास्त वेळ वाट पाहावी लागली… हे सफरचंद जास्त लाल सुंदर आणि तुझ्यासाठी उपयुक्त आहे… देवाच बोलणं ऐकून मुलगी आनंदी झाली…

       याचप्रकारे तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी वाट पाहावी लागत असेल, तर देवाची इच्छा समजून त्याचा स्वीकार करा… ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना चांगलंच देण्याचा प्रयत्न करतो… त्याचप्रमाणे देवसुद्धा त्याच्या मुलांना तेच देतो जे त्याच्यासाठी चांगलं आहे…

       मनुष्याच्या जीवनात केव्हातरी असा प्रसंग येतो की, तो अतिशय हतबल होतो… अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो… अनेक व्रते, उपवास करतो… पण देव त्याला लवकर मदत करत नाही… परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी राहते  आणि संकटात आपली इतकी मदत करते की, त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो… आपण नंतर म्हणतो सुध्दा की, त्यांनी अगदी देवासारखी मदत केली… येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की, हे सर्व ईश्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदत सुध्दा ईश्वरच करत असतो… मदत करणाऱ्या व्यक्तीला बुध्दीयोग देण्याचे कार्य सुध्दा ईश्वराचेच आहे…

       पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो, तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो… असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तिंची आठवण करावी… त्या व्यक्तिला विसरू नये… कारण देव स्वतः भेटू शकत नाही… मदत करू शकत नाही… म्हणून अशा व्यक्तिला पाठवतो आणि मनोमन देवाचे आभार मानावे…  एक निश्चय करावा की, आपणही अशीच कोणाची मदत करू… जेणेकरून ईश्वराची ही व्यवस्था अव्याहतपणे चालू राहील…

१५० दृष्टांत संग्रह पहा.

                    || बाळासाहेब हांडे ||

            भ्रमणध्वनी : ९५९४४४५२२२

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading